उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
UP Brahmin MLA Meeting : उत्तर प्रदेशच्या राजकारणात ब्राह्मण समाज भाजपचा कोअर मतदार मानला जातो. मात्र आपल्याला गृहित धरलं जात असल्याची भावना त्यांच्यामध्ये वाढू लागली आहे.

नवी दिल्ली : योगी आदित्यानाथ यांचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशातील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन जातींच्या दबावतंत्रामुळे चांगलंच तापल्याचं दिसून आलं. ठाकूर, क्षत्रिय, कुर्मी समाजापाठोपाठ लखनौमध्ये आता सर्वपक्षीय ब्राह्मण आमदारांचं स्नेहभोजन पार पडलं. त्यात सर्वाधिक वाटा भाजपच्या ब्राह्मण आमदारांचा होता. 9 ते 10 टक्के मतदार आणि 40 ते 50 ब्राह्मण आमदारांना भाजप गृहित धरतंय असा नाराजीचा सूर बैठकीत होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आपल्या जातीला जास्त झुकतं माप देतात असा आरोपही केला जातोय.
उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. हिवाळी अधिवेशन सुरु आहे आणि राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झालीय. त्यात आधी क्षत्रिय नंतर कुर्मी समाजाच्या आमदारांनी कौटुंबिक स्नेहभोजन करत शक्तिप्रदर्शन केलं.
आता सर्वपक्षातल्या 50 पेक्षा जास्त ब्राह्मण आमदारांची बैठक लखनौमध्ये पार पडली. त्यात सत्ताधारी भाजपच्या ब्राह्मण आमदारांची संख्या जास्त असल्यानं खळबळ उडाली. या स्नेहभोजनाचं आयोजन भाजपचे आमदार पीएन पाठक यांनी केलं होतं
ब्राह्मण आमदारांच्या या स्नेहभोजनाचे परिणाम भाजप संघटनेत दिसले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी तात्काळ खरमरीत पत्र लिहून भाजप आमदारांवर ताशेरे ओढले. पण त्यामुळे वाद अधिकच चिघळल्याचं दिसून आलं. उत्तर प्रदेशात शक्तिशाली मानला जाणारा ब्राह्मण समाज योगी सरकारवर आणि भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे.
UP Brahmin Voters : उत्तरप्रदेशात ब्राह्मण मतं महत्वाची का?
- उत्तरप्रदेश ब्राह्मण मतदार 9 ते 10 टक्के.
- 12 जिल्ह्यांमध्ये ब्राह्मण समाज १५ टक्क्यांपेक्षा जास्त.
- 110 विधानसभा मतदारसंघात ब्राह्मणांची मतं निर्णायक.
- 89 टक्के ब्राह्मण समाजाचं भाजपला मतदान.
- भाजप आमदार पीएन पाठक यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनासाठी सर्वपक्षीय 52 ब्राह्मण आमदारांची उपस्थिती.
- बंद दाराआड चर्चा करत शक्तिप्रदर्शन.
- त्यात 40 पेक्षा जास्त भाजपचे आमदार, भाजपमध्ये ब्राह्मणांचा आवाज दाबला जात असल्याची भावना.
- ठाकूर विरुद्ध ब्राह्मण सुप्त संघर्षामुळे उत्तर प्रदेशात वाढता असंतोष.
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या जातीला म्हणजे ठाकूरांना झुकतं माप देत असल्याचा आरोप.
- भाजप प्रदेशाध्यक्षाकडून ब्राह्मण आमदारांना तंबी.
- काही दिवसांपूर्वी ठाकूर समाजानं असंच स्नेहभोजन शक्तिप्रदर्शन केलं होतं, त्याला कुटुंब असं नाव दिलं होतं.
भाजपमधील ब्राह्मण आमदारांचा असंतोष दिसताच, समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी संधी साधत भाजपवर टीका केली. अखिलेश यादवांनी एक शेर ट्विट करत ब्राह्मण आमदारांची पाठराखण केली. 'अपनों की महफ़िल सजे तो जनाब मेहरबान, और दूसरों को भेज रहे चेतावनी का फ़रमान' असा शेर त्यांनी शेअर केला. त्यानंतर सपा नेत्यांनी भाजप आमदारांना ऑफरही देऊन टाकली.
राजकीय स्वार्थासाठी ब्राह्मण समाजाला सहज टारगेट करण्याची, अवहेलना करण्याची, गृहित धरण्याची प्रथा महाराष्ट्रात रुढ आहे. त्या तुलनेत उत्तर भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात ब्राह्मणांबद्दल आदराची भावना असल्याचं मानलं जातं. याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच लक्ष वेधलं होतं
उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या ब्राह्मण समाज भाजपचा कोअर मतदार मानला जातो. मात्र आपल्याला गृहित धरलं जात असल्याची भावना ब्राह्मण मतदार आणि ब्राह्मण आमदारांमध्येही वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय आमदार स्नेहभोजनासाठी एकत्र आले.
या दबावतंत्राची दखल योगी आदित्यनाथ किंवा मोदीशाहा घेतात का? या 40-50 ब्राह्मण आमदारांची समजूत काढण्यात यश येईल का? की हे फक्त कपातले वादळ ठरेल का यावर उत्तरप्रदेशातील पुढची गणितं अवलंबून असतील.
ही बातमी वाचा:























