Sanjay Raut on PM Narendra Modi Speech : मोदी, शाहांची फक्त पक्ष तोडण्याचीच लायकी, पाकिस्तान तोडण्याची हिंमत नाही; पंतप्रधानांच्या भाषणावर संजय राऊतांची बोचरी टीका
Sanjay Raut on PM Narendra Modi Speech : ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. आता पंतप्रधानांच्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on PM Narendra Modi Speech : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवले. या कारवाईनंतर सोमवारी (दि. 12 ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आश्रयावर असलेल्या दहशतवाद्यांना ठाम आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला. या कारवाईत भारताने अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून, 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. भारताच्या विरोधात होणारा कोणताही दहशतवादी हल्ला सहन केला जाणार नाही आणि त्याला कठोर आणि सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोचरी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, मोदींचे भाषण हे एक नंबरचे बकवास भाषण आहे. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचे भाषण नव्हते. आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीत असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवले. नाहीतर पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते.
मोदी, शाहांची फक्त पक्ष तोडण्याचीच लायकी
काल माझ्या लक्षात आले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे ईडी आणि सीबीआयच्या मदतीने फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात. पक्ष तोडणे, पक्ष विकत घेणे इतकीच यांची लायकी आहे. पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही. हिंमत असती तर पुढील दोन दिवसात पाकिस्तान फुटला असता. सैनिकांची तयारी होती, असे त्यांनी म्हटले.
भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील
संजय राऊत पुढे म्हणाले की, आता मला कळले की, हे लोक तिरंगा यात्रा काढत आहेत. भारताच्या तिरंग्याला हात लावण्याची यांची लायकी नाही. वीर सावरकरांचे स्वप्न साकार करण्याची यांना संधी होती. मात्र, या लोकांनी गौतम अदानी आणि अंबानी यांच्यासाठी व्यापार केला आहे. त्यांच्यासमोर व्यापार मोठा आहे, देश मोठा नाही. भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील, असा हल्लाबोल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर केला.
आणखी वाचा
























