सह्याद्री साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटलांचा झेंडा, पी.डी. पाटील पॅनलचा 21-0 असा दणदणीत विजय, भाजप नेत्यांच्या दोन्ही पॅनलचा पराभव
Sahyadri Sugar Mill : कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात बाळासाहेब पाटील यांचं पॅनल पुन्हा विजयी झालं आहे. आमदार मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्या स्वतंत्र पॅनलचा पराभव झाला.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांवर विजय मिळवला आहे. बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनेलनं भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांच्या पॅनलचा पराभव केला आहे. भाजपच्या आमदारांसह भाजपाच्या जिल्हाध्यक्षांच्या पॅनलचा सुपडा साफ झाला आहे.
बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्त्वातील पी.डी. पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार 7500 ते 8000 हजारांच्या मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत. त्यामुळं कराडात मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुरू आहे.
सह्याद्री साखर कारखान्याची ऐतिहासिक निवडणूक म्हणून पाहिली जात होती त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलनं एकतर्फी विजयी मिळवला. भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनलचा धुवा उडवत 21 जागांवर बाळासाहेब पाटील यांचे पॅनल विजयी झाले. बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनलनं मोठा विजय मिळवल्यानंतर कराड शहरात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली.
सह्यादी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत गेल्या दीड महिन्यात सातत्यानं पाचही तालुक्यातील सभासद, ज्यांनी परिश्रम घेतले ते सर्व नेत्यांचे आभार मानले. कारखान्याच्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाणांच्या विचारासोबत राहणाऱ्या मतदारानं पी.डी. पॅनेलवर विश्वास टाकला. 1999 पासून दोन टर्म आणि त्यानंतर मतदार फेररचना झाल्यानंतर तीन टर्म मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शरद पवार साहेबांनी मला सहकार खात्याची जबाबदारी दिली. विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाला, माझाही झाला. मात्र, पराभवानं खचून जायचं नसतं. विजय झाला तर विजय पचवता आला पाहिजे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कामाला लागा
विधानसभेच्या विजयानंतर काही लोकांनी सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक जिंकणार अशा वल्गना केल्या. कारखान्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही, असं बाळासाहेब पाटील म्हणाले. आपण दिमाखानं निवडणुकीला सामोरं गेलो. 31 जानेवारीला या गावात सभा झाली, दिशा निश्चित केली. त्यानंतर 80 गावात गेलो आणि खोटं नरेटिव्ह पसरवलं होतं, ते खोडून काढलं, असं बाळासाहेब पाटील म्हणाले. आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, त्या सर्व सभासदांना विजय समर्पित करतो, असं बाळासाहेब पाटील म्हणाले.
अर्थकारणाच्या जोरावर राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. सह्याद्रीचा स्वाभिमानी सभासद त्या गोष्टीला बळी पडेल अशा गोष्टी करण्यात आल्या. मतदान झाल्यानंतर या गावात इतके पैसे दिले, त्या गावात तितके पैसे दिले गेल्याचं सांगितलं गेलं. पैसा दिलं तर काहीही करु शकतो अशी प्रवृत्ती आहे त्याचा वेळीच बंदोबस्त केला आहे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले.
आपल्याला भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा आणि विधानसभेसाठी कामाला लागायचं आहे. मतपत्रिकेवर मतदान झालं याचा आनंद झाला. राज ठाकरेंचं भाषण कशा प्रकारचं होतं ते पाहिलेलं आहे. विधानसभेचा पराभव कार्यकर्त्यांना मान्य नव्हता त्यामुळं आजचा उत्साह दिसतोय, असं बाळासाहेब पाटील म्हणाले. नव्या जोमानं कारखाना चालवू त्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले.






















