NCP Sharad Pawar Faction Mandal Yatra : मनोज जरांगेंचे आंदोलन सुरु असतानाच शरद पवार गटाची 'मंडल यात्रा' तात्पुरती स्थगित, नेमकं कारण काय?
NCP Sharad Pawar Faction Mandal Yatra : ओबीसींच्या जागरासाठी 9 ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून मंडल यात्रा काढण्यात आली होती.

NCP Sharad Pawar Faction Mandal Yatra : ओबीसींच्या जागरासाठी 9 ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून मंडल यात्रा (Mandal Yatra) काढण्यात आली होती. मात्र, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Faction) आपली सुरू असलेली ‘मंडल यात्रा’ तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
9 ऑगस्टला नागपूरात ओबीसींच्या जागरासाठी शरद पवार गटाकडून मंडल यात्रा काढण्यात आली होती. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार या यात्रेला हिरवी झेंडी दाखविली होती. भाजपाचे ओबीसी विरोधी धोरण आणि शरद पवार यांनी ओबीसी समाजासाठी केलेले कार्य हे जनतेपर्यत पोहविण्यासाठी ही मंडल यात्रा काढण्यात येत होती. पहिल्या टप्पात विदर्भातील 11 जिल्ह्यात ही यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंडल आयोग राज्यात लागू केला होता. महाराष्ट हे मंडल आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले होते. आज ओबीसीवरचे भाजपाचे प्रेम हे पुतना मावशीचे आहे. शरद पवार यांनी ओबीसीसाठी काय केले? याची माहिती राज्यातील जनतेला व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष राज राजापुरकर यांच्या नेतृत्वात राज्यभर मंडल यात्रा काढण्यात येत होती.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
गेल्या 18 दिवसांपासून ही यात्रा राज्यभरात सुरू होती. मात्र सध्या मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता पुढील अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपली सुरू असलेली ‘मंडल यात्रा’ तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले राज राजापुरकर?
ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना याबाबत माहिती दिली. राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कारणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मंडल यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या?
























