BMC Election: मुंबईत भाजपकडून दगाफटका झाल्यास स्वतंत्र लढण्याची चाचपणी, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांचा दबाव
संयुक्त पत्रकार परिषदेत 150 जागांवर सकारात्मक चर्चा झाली असली तरी 77 जागांवर रस्सी खेच होण्याची शक्यता आहे. या 77 जागांमध्ये शिवसेनेचे काही वाॅर्ड आहेत त्यावर भाजपकडूनही दावा केला जात आहे.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवर महायुतीत एकमत झाले असून उर्वरित 77 जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हणत असले, तरी शिवसेनेच्या बालेकिल्यावर भाजपची नजर आहे. शिवसेना भाजपची युतीची चर्चा जरी होत असली, तरी शिवसेनकडून 227 जागांवर मुलाखती घेतल्या जात आहेत. यावरून भाजपकडून दगा फटका झाल्यास स्वतंत्र लढण्याबाबतही शिवसेना चाचपणी करत असल्याचे दिसून येते.
आपण स्वतंत्र निवडणूक लढायला हवी
युतीची चर्चा जरी होत असली तरी शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यावर भाजपची नजर आहे. शिवसेनेच्या या जागा स्वत:कडे घेण्यासाठी भाजप आग्रही असताना, या जागांबाबत तडजोड करू नये, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे स्वतंत्र लढण्यासाठी शिंदे यांच्यावर शिवसेना नेत्यांकडून दबाव आणला जात आहे. काल संयुक्त पत्रकार परिषदेत 150 जागांवर सकारात्मक चर्चा झाली असली तरी 77 जागांवर रस्सी खेच होण्याची शक्यता आहे. या 77 जागांमध्ये शिवसेनेचे काही वाॅर्ड आहेत त्यावर भाजपकडूनही दावा केला जात आहे. इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी आपण स्वतंत्र निवडणूक लढायला हवी अशी इच्छाही मुलाखत घेणाऱ्या नेत्यांजवळ अनेकानी बोलून दाखवली. दुसरीकडे, उर्वरित 77 जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या चर्चेचा निकाल लागेल, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिली. साटम म्हणाले की, उर्वरित जागांवर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमताने घेतील. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा निर्धार महायुतीचा असून मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकजुटीने काम करत आहेत.
महायुतीचाच महापौर बसणार
कोण किती जागा लढणार यापेक्षा महायुती 227ही जागा लढवेल आणि 150 पेक्षा अधिक जागा जिंकून महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास साटम यांनी व्यक्त केला. गेली 25 वर्षे महानगरपालिकेत सत्तेत राहून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत, मुंबईकरांच्या हितासाठी हा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे त्यांनी सांगितले. धनुष्यबाण आणि कमळ हे एकाच ध्येयासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना साटम म्हणाले की, गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींशी कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत.
150 जागांवर एकमत
उदय सामंत म्हणाले की, 150 जागांवर आधीच सहमती झाली असून उर्वरित 77 जागांवर चर्चा होईल. जागावाटपापेक्षा महायुतीची एकजूट महत्त्वाची आहे. अमित शाह यांनी सांगितल्याप्रमाणे, 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उर्वरित जागांवर मतभेद राहिल्यास त्यावर निर्णय फडणवीस आणि शिंदे घेतील. कोणत्याही मुद्द्यावरून महायुती तुटणार नाही, कारण मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करणे हेच आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या























