Aaditya Thackeray & Girish Mahajan on Amit Thackeray : भारत-पाक शस्त्रसंधीनंतर अमित ठाकरेंचं PM मोदींना पत्र, बंधू आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; गिरीश महाजनांचा टोला
Aaditya Thackeray & Girish Mahajan on Amit Thackeray : अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर देशभरात निघणाऱ्या तिरंगा यात्रांवर नाराजी व्यक्त केली.

Aaditya Thackeray & Girish Mahajan on Amit Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक पत्र लिहून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर (India Pakistan Ceasefire) देशभरात निघणाऱ्या तिरंगा यात्रांवर आणि साजऱ्या होणाऱ्या जल्लोषावर नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, आपण युद्ध जिंकलं नाही, केवळ युद्धविराम झाला आहे. त्यामुळे साजरा होणारा हा जल्लोष खूपच वेदनादायक वाटतो, अशी खंत अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आता यावर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अमित ठाकरे यांना टोला लगावला आहे.
अमित ठाकरेंच्या पत्रावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
दरम्यान, अमित ठाकरे यांच्या पत्रावर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानवर जो यशस्वी हल्ला केला, त्याच आम्ही अभिनंदन करतो. मात्र, या दरम्यान एकाही देशाने पाठिंबा दिला नाही. शशी थरूर यांना मध्यस्थी करावी लागली. पहेलगाम ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत सर्वच चर्चा झाली पाहिजे. त्यामुळे या यात्रांकडे तसं पाहिलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
गिरीश महाजनांचा अमित ठाकरेंना टोला
गिरीश महाजन म्हणाले की, संपूर्ण देशाने आणि जगाने बघितले आहे की, आपण काय केलं आहे. तुम्हाला त्याबाबतही काही शंका आहे का? हे लोक प्रसिद्धीसाठी का असे पत्र लिहितात? हे मला काही कळत नाही. पत्र लिहिण्याची काही आवश्यकता नाही. सगळ्या जगाने पाहिले आहे की, आमच्या सैन्याने काय केले आहे. तुम्हाला आता रिझल्ट पाहिजे, उत्तर पत्रिका पाहिजे, हा सगळा बालिशपणा सुरु आहे, असा टोला त्यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.
शिवराज दिवटे प्रकरणात कठोर कारवाई होईल : महाजन
बीडच्या परळी इथे शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, मी सुद्धा ही बातमी बघितली. त्या तरुणाला खूप अमानुषपणे मारहाण झाली. या प्रकरणात कारवाई होत आहे, अधिक कठोर कारवाई त्यात होईल. समाजामध्ये मानसिक विकृतीच एवढी वाढली आहे तर त्याला आता कोण काय करणार? पुढे असे काही घडणार नाही, असा चोख बंदोबस्त पोलीस करतील, असे त्यांनी म्हटले.
एकनाथ खडसे यांच्याबद्दल मी काय बोलू : महाजन
जळगावमधील ड्रग्स प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणातील संशयित अब्रारर कुरेशी हा पसार आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे संशयिताच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. यानंतर दत्तात्रय पोटे याला निलंबित करण्यात आले. यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांमधील एक स्वीय सहायक काम करत असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्याबद्दल आता मी काय बोलू. कुठेही काही झालं तरी त्यांना आता मीच दिसतो. पोलीस अधिकारी पोटे आरोपीसोबत फोनवर वारंवार बोलत होते. त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई झाली आहे. मग कशासाठी आपण फालतू बडबड करायची? हे काय मला कळत नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा























