BMC Election 2026: भाजपने एकनाथ शिंदेंची 'त्या' 84 जागांची मागणी धुडकावून लावली; ठाकरेंशी थेट सामना झाल्यास पराभवाचा धोका, बैठकीत नेमकं काय घडलं?
Shivsena and BJP seat sharing in Mumbai: भाजप आणि शिवसेनेची जागावाटपाची बैठक काल पार पडली. या बैठकीत भाजपने 2017 साली शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागा शिंदे गटाला देण्यास विरोध केला आहे.

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपासाठी गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने 2017 साली जिंकलेल्या 84 जागांवर आपला दावा सांगितला. मात्र, भाजपने (BJP) शिंदेसेनेची ही मागणी सपशेल धुडकावून लावली. भाजपने 2017 मध्ये शिवसेनेने (Shivsena) जिंकलेल्या 84 जागा यंदाही शिंदे गटाला सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत शिवसेनेने शिंदे गटाला मुंबईत फक्त 52 जागा देऊ केल्याची चर्चा होती. मात्र, कालच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर दोन्ही पक्षांनी ही बाब नाकारली होती. परंतु, जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्येक जागेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसत आहे. जागावाटपच्या दुसऱ्या बैठकीनंतर शिवसेना-भाजपने 150 जागांवर एकमत झाल्याचे सांगितले असले तरी शिवसेनेला हव्या असलेल्या जागा भाजपकडून सोडल्या जाताना दिसत नाहीत.
शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या या जागा न सोडण्यासाठी भाजपने एक नवी थिअरी मांडली आहे. 2017 साली मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्यावतीनं निवडून आलेल्या 84 जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आला होता. मात्र, या जागा सोडण्यास भाजपकडून स्पष्ट नकार दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी बहुतांश जागांवर शिंदे गटाचा सामना ठाकरे गटाशी होऊ शकतो. तसे घडल्यास शिंदे गटाच्या उमेदवारांच्या पराभवाची शक्यता अधिक आहे. शिंदे-ठाकरे थेट लढत झाल्यास महायुतीचे नुकसान होईल. त्यामुळे शिंदे गटाची पूर्ण ताकद असलेल्या जागाच शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. यावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परंतु, भाजपने 2017 मध्ये जिंकलेल्या 82 प्रभागांपैकी मराठीबहुल जागांची शिंदे गटाशी अदलाबदल करुन याची भरपाई होऊ शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 20 जणांचा समावेश आहे. या समितीमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासारख्या बड्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.
आणखी वाचा
























