![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nashik Rain : "या अल्लाह बारीश अताह फरमा"; मालेगाव शहरात मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी विशेष दुवा पठण
Nashik Malegaon : मालेगाव शहरात मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी विशेष दुवा पठण करत दुवा मागितली.
![Nashik Rain : maharashtra Nashik news Special duva recitation for rain by Muslim brothers in Malegaon city Nashik Rain :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/14/d8829bc3c338c9c52acb6e46158937671692008073177738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मालेगाव : नाशिकसह (Nashik) जिल्हाभरात पावसाने ओढ दिली असल्यांमुळे अनेकजण चिंतेत आहेत. त्यामुळे सर्वस्तरावरून वरुणराजाला साकडे घालण्यासाठी अनेक क्लुप्त्या केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या शाळेने लगान सामन्याचे आयोजन केले होते. अशातच पावसासाठी मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांनी विशेष दुवा पठण अदा केली. या विशेष प्रार्थनेसाठी हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले होते.
राज्यात सर्वत्र पाऊस बरसत (Maharashtra Rain) असताना नाशिकसह जिल्ह्यातील बहुतांश भागावर पाऊस नाराज (Nashik Rain) असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी चिंतित असून, याच पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लीम बांधवांनी मुंशी शहा दर्गा येथे दुवा पठण करून वरुणराजास साकडे घातले. मागील दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढलेली आहे. चांगला पाऊस पडावा सगळीकडे शेत शिवार फुलावे, नद्या, धरणे तुडूंब भरुन वाहावे यासाठी नाशिकच्या मालेगाव (Malegaon) मध्ये 'ऑल इंडिया सुन्नी जमीअतुल इस्लाम'च्या वतीने विशेष दुवा पठण करून पावसासाठी अल्लाला साकडे घालण्यात आले. मुंशी शहा दर्गा येथे आयोजित कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत पावसासाठी विशेष दुवा पठण केले. मौसम नदी काठावरील दर्गापर्यंत यावेळी मिरवणूकही काढण्यात आली.
दरम्यान, पावसाळा (Rainy Season) सुरू होऊन दोन महिने झाले असताना अद्यापही नाशिक जिल्ह्यावर वरुणराजाने वक्रदृष्टी फिरवली नसल्याचे चित्र आहे. तुरळक पावसाच्या सरी वगळता तालुक्यात कुठेही जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली नाही. शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावरच खरीप पिकाच्या पेरण्या केल्या; परंतु नंतर पाऊसच नसल्याने खरिपाची पिके करपू लागली असून, दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. नाशिक शहरात ऑगस्ट महिन्यापर्यंत अनेकदा गोदावरीला पूर येत असतो. मात्र यंदा एकही पूर अनुभवयास मिळालेला नाही. त्यामुळे नाशिककर देखील चिंतातुर आहेत.
मुस्लिम बांधवांकडून दुवा पठण
दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश भागात दमदार पाऊस नसल्याने नद्यांचे पाणी कमी झाले आहे. धरणे अद्यापही पुरेशी भरलेली नाहीत. त्याचबरोबर शेतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात जोरदार पाऊस न आल्यास पाणी टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालेगाव शहरातील मुंशी शहा दर्गा येथे पावसासाठी मुस्लीम बांधवांतर्फे दुवा पठण करण्यात आले. 'ऑल इंडिया सुन्नी जमीअतुल इस्लाम' च्या वतीने विशेष दुवा पठण करून पावसासाठी अल्लाला साकडे घालण्यात आले. या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी देवाने मदत करावी, पाऊस पाडावा, अशी प्रार्थना दुवा पठणादरम्यान ‘अल्लाह’कडे एकरूप होऊन हजारो मुस्लिम बांधवांनी केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)