Girish Mahajan on Nashik Tree Cutting: नाशिक मनपाने तपोवनात 'माईस हब' करण्याचं टेंडर काढलं, विरोधकांसह सत्ताधारी एकवटल्यानंतर गिरीश महाजनांची माघार; पण वृक्षतोड...
Girish Mahajan on Nashik Tree Cutting: तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात विरोधी पक्षांबरोबर सत्ताधारी मित्रपक्ष देखील एकवटल्याने 'माईस हब'च्या विषयावरून मंत्री गिरीश महाजन यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.

Girish Mahajan on Nashik Tree Cutting: नाशिकच्या तपोवन (Tapovan) परिसरातील प्रस्तावित साधूग्राम (Sadhugram) प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड (Tree Cutting) होणार आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे त्या ठिकाणी PPP अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप तत्ववार प्रदर्शन केंद्र, बॅक्वेंट हॉल, रेस्ट्रोरंट उभारण्याच्या घाट घातला जात आहे. या संदर्भात 220 कोटी रुपयांचे टेंडर महापालिका प्रशासनाने काढले असून 33 वर्षासाठी इथली जागा खाजगी विकासकाला दिली जाणार असल्याचा आरोप केला जात आहे. तपोवनमधील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींसह विविध संघटना, विरोधी पक्षांबरोबर सत्ताधारी मित्रपक्षांनीही विरोधाची भूमिका घेत आंदोलनाचे सत्र राबविल्यानंतर प्रदर्शनी केंद्राच्या (माईस हब) विषयावरून मंत्री गिरीश महाजन यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.
Girish Mahajan on Mice Hub: प्रदर्शन केंद्र किंवा व्यावसायिक काम होणार नाही
गिरीश महाजन म्हणाले की, तपोवनात प्रदर्शन केंद्राची निविदा कशी निघाली माहिती नाही. परंतु, एकही झाड तोडून या ठिकाणी प्रदर्शन केंद्र किंवा व्यावसायिक काम होणार नाही. नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (निमा) ही जागा कायमस्वरुपी प्रदर्शन केंद्रासाठी मागितली होती. परंतु, आम्ही तो प्रस्तावही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Girish Mahajan on Nashik Tree Cutting: लहान झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण केले जाईल
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, कुंभमेळ्यात साधू-महंत तपोवनात राहतात. त्यांची बाहेर व्यवस्था करा, म्हणणे योग्य होणार नाही. साधुग्रामसाठी मागील काही वर्षात वाढलेली लहान झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण केले जाईल. हे पुनर्रोपण 70 टक्क्यांहून अधिक यशस्वी होईल. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नव्याने 15 हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. राज्य शासन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. यास नाशिक शहराचा अपवाद नाही. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच तपोवन परिसरातील दहा वर्षांच्या आतील वृक्षांची तोड न करता त्यांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या























