वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा मोकाट सुटणार? नव्या कायद्यामुळे मुंबई पोलिसांचा गोंधळ
Worli Hit And Run Case: एक जुलैपासून नवा कायदा लागू झाला आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेलं मुंबईतील हिट अँड रनचं पहिलंच हाय-प्रोफाईल प्रकरण आहे.
![वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा मोकाट सुटणार? नव्या कायद्यामुळे मुंबई पोलिसांचा गोंधळ Will Mihir Shah accused in Worli hit and run case will be acquitted Confusion of Mumbai police due to new law Worli Hit and Run Case Mumbai News वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा मोकाट सुटणार? नव्या कायद्यामुळे मुंबई पोलिसांचा गोंधळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/6371dc092a120d13e9b480538e6c1b7b172051081751988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Worli Hit And Run Case: मुंबई : वरळीतील (Worli) हिट अँड रन प्रकरणानं (Hit And Run Case) सर्वांनाच हादरवलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. पण, या प्रकरणानं मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) पुरता गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. 1 जुलैपासून लागू झालेल्या नव्या कायद्यांमुळे मुंबई पोलिसांची याप्रकरणात गुन्हा दाखल करताना पुरती गोची झाली आहे. वरळी अपघात प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना अटक केली. पण, कोर्टाकडून त्यांना 15 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला. तर, सहआरोपी बिडावत याला एक दिवसाची कैद सुनावली.
एक जुलैपासून नवा कायदा लागू झाला आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेलं मुंबईतील हिट अँड रनचं पहिलंच हाय-प्रोफाईल प्रकरण आहे. मात्र, या नव्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करताना पोलिसांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांच्यावर भारतीय न्याय संहितेमधील कलम 105 (सदोष मनुष्यवध), 238 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, शहा यांच्यावर कलम 105 का लावलं? यावर तपासअधिकारी आणि पोलीस अधिकारी निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावर न्यायाधीश भोसले यांनी स्वतः पोलिसांना बीएनएसचं पुस्तक देत कलम लावण्याआधी पोलिसांनी थोडा 'होमवर्क' करावा अशी, समज दिली.
रस्ता सुरक्षेबाबत भारतीय न्यायिक संहितेच्या नव्या कायद्यात असं म्हटलं आहे की, एखाद्या वाहनामुळे अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर लगेचच, वाहन चालकानं अपघाताची माहिती पोलिसांना किंवा प्रशासनाला दिली, तर त्याच्यावर मोठी कारवाई केली जाणार नाही. त्यासोबतच अपघातानंतर चालक कोणालाही काहीही न सांगता फरार झाला तर त्याला किमान 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेचं प्रावधान आहे. पण नव्या कायद्यात आणखी एक गोष्ट जोडायला विसरले की, जर एखाद्यानं गाडी चालवताना एखाद्याला त्याच्या कारच्या बोनेटवर कित्येक किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं तर त्याला काय शिक्षा दिली जाईल?
त्यामुळे आता नव्या कायद्याबाबतच्या प्रशासनाच्या गोंधळामुळे वरळीत हिट अँड रन प्रकरणातील मृत कावेरी नाखवा यांना न्याय मिळणार की, नाही? हा प्रश्नच उद्भवल्याचं पाहायला मिळतंय....
पोलिसांनी कोर्टात काय घटनाक्रम सांगितला?
वरळी हिट अँड रन प्रकरणातील रिमांड कॉपीत पोलिसांनी म्हटलं की, राजेश शहा यांची मिहीरला पळून जाण्याची सूचना केली होती. मिहीरच्या बीएमडब्ल्यूनं स्कूटीवरून जाणाऱ्या प्रदीप आणि कावेरी नाखवा यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ज्यानं दोघेही बोनेटवर कोसळले. मिहीरनं जोरात ब्रेक लावला खरा, पण प्रदीप नाखवा गाडीच्या डाव्या बाजूला कोसळला. तर, कावेरी यांची साडी चाकात अडकल्यानं त्यांना बाजूला होता आलं नाही. आरोपी मिहीर शाहनं वरळीत तब्बल दीड किलोमीटर अंतरापर्यंत कावेरी नाखवा यांना गाडीनं फरपटत नेलं. पुढे, मोकळ्या रस्त्यावर कार थांबवून बोनेटमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाजूला ढकलंलं. त्यांना मदत करण्याऐवजी, जागा बदलून ड्रायव्हरच्या हाती कार दिली. कावेरी नाखवा यांच्या अंगावरून भरधाव गाडी नेत दोघांनी पळ काढल्याची माहिती सीसीटीव्हीतून समोर आली आहे.
मिहीर आणि ड्रायव्हर राजऋषी दोघेही वांद्रे परिसरात आले. तिथं ड्रायव्हर बिडावतनं राजेश शहा यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा शहा यांनी त्याला अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितलं आणि मिहीरला पळून जाण्याच्या सूचना दिल्या.
मिहिरनं अपघातानंतर उपनगरात राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी एक झोप काढली. अपघातानंतर वडिलांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर मिहीरनं गोरेगाव परिसरात राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडला जवळपास तीस ते चाळीस कॉल केले. गर्लफ्रेंडनं याबाबत त्याच्या घरी फोन करून सांगताच, त्याच्या बहिणीनं गर्लफ्रेंडचं घर गाठलं. त्यानंतर बहीण पूजा त्याला घेऊन बोरिवलीच्या घरी गेली. तिथून घराला कुलूप लावून आई मीना आणि बहिणीसह तो फरार झाल्याचं समोर आलं आहे.
गाडीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
गुन्हा घडल्यानंतर कार वांद्रे कलानगर परिसरात उभी करण्यात आली. चालक राजऋषी बिडावत याने राजेश शहा यांना फोन करून घटनेची माहिती देताच राजेशनं कलानगर येथे धाव घेतली. तोपर्यंत मिहीर तिथून पळून गेला होता. राजेश यांनी टोईंग व्हॅनलाही फोन करून तिथं बोलावलं. तोवर गाडीवरील पक्षाचं चिन्ह आणि नंबर प्लेट काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र टोईंग व्हॅन घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच वरळी पोलीस तिथं पोहोचले आणि त्यांनी राजेशसह चालकालाही ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)