रस्ते वेगळे आहेत मात्र मैत्री कायम; याचा अर्थ भाजपसोबत सरकार बनवणार असा नाही; संजय राऊतांची फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
रस्ते वेगळे आहेत मात्र आमची मैत्री कायम आहे, पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही सरकार बनवणार आहोत, असं संजय राऊत फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.

मुंबई : "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेसोबत आमची दुश्मनी नाही. मी देखील अनेक दिवसांपासून हेच म्हणत आहे. आम्ही काय भारत-पाकिस्तान थोडीच आहोत. भेटीगाठी होत असतात. बातचीत होत असते. परंतु राजकीय दृष्ट्या आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. फडणीस यांचं देखील हेच म्हणणं आहे. आपण पाहिलं असेल आमिर खान आणि किरण राव यांचे रस्ते वेगळे झाले, मात्र मित्र कायम आहेत. आमचंही तसंच आहे. रस्ते वेगळे आहेत, मात्र मैत्री कायम आहे. आगामी काळात देखील आमची मैत्री कायम राहील. मात्र याचा अर्थ हा नाही की, आम्ही सरकार बनवण्यासाठी जात आहोत. परिस्थिती आत्ता काय आहे आणि उद्या काय असेल याचं भविष्य कोणीच सांगू शकत नाही. माझ्यापेक्षा जास्त माहिती देवेंद्र फडणवीसांकडे असते. या क्षणी महाराष्ट्रात जे सरकार आम्ही बनवलं आहे ते उत्तम सुरु आहे. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार", अशा प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "शिवसेनेशी आमचं कोणतंही शत्रुत्व नाही. आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी आमचा हात सोडला आणि ज्यांच्याविरोधात आम्ही लढलो, त्यांचाच हात शिवसेनेनं पकडला. म्हणूनच आमच्यात मतभेद निर्माण झाले आहेत." फडणवीसांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारी पत्रकार परिषद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळली या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, "भविष्यात मुख्यमंत्री नक्कीच पत्रकारांसोबत बोलतील. कोरोनाची एकंदरीत परिस्थिती पाहता ते गर्दीत जात नसावेत." मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, "मोहन भागवत यांनी जे सांगितलं आहे ते बरोबर आहे. आपल्या सर्वांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे धर्माचा आणि जातीचा विषय येत नाही. आम्ही भागवत यांच्या मताशी सहमत आहोत.
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहिलं आणि नितिन गडकरी यांच्या साखर कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, "नितीन गडकरी यांच्या साखर कारखान्याबाबतच्या प्रकरणाची मला माहिती नाही. ज्याबाबत माहिती नाही त्याबाबत शिवसेना बोलत नाही. आरोप प्रत्यारोपांचे धंदे शिवसेना करत नाही. मात्र आमच्या पिंपरी चिंचवडच्या एका पदाधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घोटाळ्याची पोलखोल केली आहे. त्या कंपनी बाबत सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. त्याबाबत आमच्या पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. त्यांच्याजवळ सर्व माहिती आहे."
आज होणाऱ्या अधिवेशनाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "विरोधीपक्ष अधिवेशन होऊ देत नाहीत. हे त्यांचं अपयश आहे. आम्हाला वाटतंय की उलट 2 दिवस व्यवस्थित अधिवेशन पार पडावं. आम्हाला वाटतंय महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या प्रश्नबाबत व्यवस्थित चर्चा व्हावी. तुम्ही दबाव टाकण्यापेक्षा काय करायला हवं याबाबत बोला. तुम्ही केवळ गोंधळ करणार असाल तर नाही राज्य चालेल नाही देश चालेल. ही बाब मी नाही मोदी म्हणतात."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Assembly Session 2021 : अधिवेशनात विरोधी पक्षाच्या 'उद्योगां'चाही भांडाफोड करा : सामना
- ED : ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे; अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से






















