माहिमचा समुद्रातील दर्गा तोडा, भोंगे बंद करा, महाराष्ट्राला लुटून सुरतेला गेलेले अलिबाबा आणि 40 जण; राज ठाकरेंच्या घणाघाती भाषणातील दहा मुद्दे
Raj Thackeray Speech : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर पक्ष कधीच फुटला नसता, नारायण राणे बाहेर गेले नसते, मी पक्षात रहावं असं उद्धव ठाकरे यांना वाटत नव्हते असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबई: बाळासाहेब असते तर शिवसेना फुटलीच नसती, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मी शिवसेनेतून बाहेर पडलो आणि त्यांनाच कंटाळून अलिबाबा आणि 40 चोर शिवसेना सोडून बाहेर पडले अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले असंही ते म्हणाले. राज्य सरकारने मशिदीवरील भोंगे काढावेत अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करावेत, आम्ही ते काढतो असं राज ठाकरे म्हणाले. तसेच माहिमच्या समुद्रात अनधिकृत उभा केलेला दर्गा एका महिन्यात तोडावा अन्यथा त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपती मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले.
1. मनसे संपलाय अशी टीका ज्यांनी केलीय त्यांची आज अवस्था काय...
अनेकांनी म्हटलं होतं की हा संपलेला पक्ष आहे.... जे बोलले त्यांची अवस्था काय झालीय असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
2. शिवसेना लहानपणापासून अनुभवलो... त्याचा वाद पाहून वेदना झाल्या
शिवसेना आणि धनुष्यबाण यावरुन जो वाद सुरू होता त्यामुळे वेदना होत होत्या, कारण लहानपणापासून शिवसेना अनुभवली. असंख्य लोकांनी घामातून उभी केलेल्या संघटनेची अवस्था अशी होताना वाईट वाटत होता. पक्ष संपवणारे हे विठ्ठलाभोवतीचे बडवे, तेच चार लोक शिवसेना संपवणार असं म्हणालो होतो. त्यावेळी बाहेर पडलो.
3. शिवसेना म्हणजे शिवधनु्ष्य... बाळासाहेबांना सोडून कुणालाही झेपणार नाही, म्हणून शिवसेनेतून बाहेर
शिवसेना म्हणजे शिवधनु्ष्य... बाळासाहेबांना सोडून कुणालाही झेपणार नाही याची कल्पना होती. एकाला झेपलं नाही, आता दुसऱ्याला झेपेल का नाही ते माहिती नाही असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला.
4. मी शिवसेनेतून बाहेर जावं हीच उद्धव ठाकरे यांची इच्छा
सगळ्यांना फक्त महाबळेश्वरची घटना सांगितली जाते. त्या आधीचं लोकांना माहिती हवंय म्हणून सांगतोय. मी उद्धव ठाकरे यांना म्हणालो होतो की, तुला काय हवंय? मला फक्त प्रचारापुरतं बाहेर काढू नका... त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की ठिक आहे. त्यानंतर बाळासाहेबांच्या समोर त्यांना सगळं मिटल्याचं सांगितलं. पण त्यावेळी उद्धव ठाकरे आलेच नाहीत. त्यांना फक्त मी बाहेर जावं असं वाटतं होतंय
5. उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची आणि बाळासाहेबांची भेट होऊ दिली नाही
नारायण राणे बाहेर गेलेच नसते, त्यांच्या मनात पक्ष सोडून जायचं नव्हतं. त्यावर मी त्यांना बाळासाहेबांना भेटायला जाणार होतो, पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे आधी हो म्हणालेल्या बाळासाहेबांनी नंतर राणेंना भेट द्यायला नकार दिला. त्यामागे उद्धव ठाकरे यांचा हात होता. आज शिवसेनेची अवस्था वाईट झाली असून बाळासाहेब असते तर शिवसेना फुटली नसती असं राज ठाकरे म्हणाले.
6. हे अलिबाबा आणि 40 जण, महाराष्ट्रात लूट करुन सुरतेला गेलेले हे पहिलेच; राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला
शिवसेना फुटल्यानंतर अलिबाबा आणि 40 जण बाहेर गेले. महाराज सुरतेवरून लूट करुन महाराष्ट्रात आले... पण महाराष्ट्रातून लूट करून सुरतेला गेलेले हे पहिलेच. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, राज्यासाठी काम कर, उद्धव ठाकरे यांच्या मागे भाषणं देत फिरू नका असा टोला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी पहिल्यांदाच पाहतोय. एकदा निवडणूक लावा, जे काय व्हायचं ते होऊन जावूदे असं ते म्हणाले.
7. पाकिस्तानात जाऊन त्यांना खडे बोल सुनावणारे जावेद अख्तर यांच्यासारखे मुस्लिम मला हवेत; राज ठाकरे
मला जावेद अख्तर यांच्यासारखे मुस्लिम हवेत, त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनाच खडे बोल सुनावले, त्यांच्यासारखे महाराष्ट्रातील मुस्लिम मला हवेत असं राज ठाकरे म्हणाले.
8. राज्य सरकारने मशिदीवरील भोंगे काढावे किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करावं, आम्ही काढतो
मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मशिदीवरील भोंगे काढावेत. एक तर तुम्ही करा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, आम्ही ते काढतो असं राज ठाकरे म्हणाले. सोबत मनसे कार्यकर्त्यांवरील नोंद करण्यात आलेले गुन्हेमागे घ्या असंही ते म्हणाले.
9. माहिमच्या समुद्रातील दर्गा जर तोडला नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करणार
माहिमच्या समुद्रामध्ये दर्गा तयार करण्यात आला आहे. दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली नाही तर याद राखा असं आव्हानदेखील राज ठाकरे यांनी दिलं.
10. मुंबई आहे की डान्सबार हेच समजत नाही
मुंबईच्या सुशोभिकरणासाठी 1700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रात्री मुंबईत खांबावर लाईट्स दिसतात, त्यामुळे कळतच नाही की मुंबई आहे की डान्सबार आहे.























