ST कर्मचाऱ्यांच्या पगाराची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहचत नाही, आता दर महिन्याला अर्थमंत्रालयात ठाण मांडणार : प्रताप सरनाईक
Pratap Sarnaik: आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा पगार मागत आहोत, या महिन्यात प्रश्न सुटला पाहिजे, इतर कर्मचाऱ्यांना पगार मिळतो, एस टी कर्मचाऱ्यांचे का नाही मिळत? असा सवाल देखील यावेळी प्रताप सरनाईकांनी उपस्थित केला आहे.

मुंबई: एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती. आज प्रताप सरनाईक यांनी परिवहन अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व कागदपत्रांवर सही करत आज अधिकृत रित्या अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारला आहे, त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवरती भाष्य केलं आहे. एसटी बसता प्रवास खडतर आहे पण चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. आता परिस्थिती चांगली नाही. पण, माझ्याकडे असलेल्या अनुभवातून येत्या दीड दोन वर्षात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. वेतनाचा प्रश्न काल तुमच्या माध्यमांतून पोहचला होता. 900 कोटींची मागणी होत असताना केवळ 272 कोटी मिळावे हे बरोबर नव्हते, 30 ते 50 हजारांचा पगार त्यांना असतो, भविष्य निर्वाह निधी वगैरे पण द्यायचा असतो, काल ही सर्व बाब समोर आली, काल मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो त्यांनी मग वित्त सचिवाची बोलून मंगळवार पर्यंत पगार होईल असे सांगितले आहे. आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा पगार मागत आहोत, या महिन्यात प्रश्न सुटला पाहिजे, इतर कर्मचाऱ्यांना पगार मिळतो, एस टी कर्मचाऱ्यांचे का नाही मिळत? असा सवाल देखील यावेळी प्रताप सरनाईकांनी उपस्थित केला आहे.
आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे
आमची फाइल वित्त विभागाकडून थेट पुन्हा आमच्या अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते, वित्त मंत्रीकडे जात नाही ही शोकांतिका आहे. मी घोषणा करतो, की आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे, मी दर महिन्याच्या 5 तारखेला वित्त सचिवांकडे जाऊन बसणार, त्यांना देखील कळायला हवे, की पगार द्यावा लागतो, आज देखील मी मंत्रालयात जाणार आणि त्यांच्या कडे बसणार आहे. पीएफचे निर्णय कुठल्याही प्रकारे इतर ठिकाणी वापरायचे नाही, असा निर्णय मी घेतला आहे, जर तसे झाले तर तुम्ही आणि मी सुद्धा जेलमध्ये जाऊ. आज अजित दादांचे वक्तव्य मी ऐकले, कोणतेही महामंडळ कधी नफ्यात नसते, ते बरोबर आहे,
किमान शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न हे जाहिरातीच्या माध्यमातून मिळाले पाहिजे हे मी सांगितले आहे. डेपोमध्ये असलेले पेट्रोल पंप रिलायन्स, इंडियन ऑईल सारख्या कंपन्यांना देऊन त्यांचे आणि आमचे देखील उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे, असंही सरनाईकांनी यावेळी म्हटलं आहे. काही डेपो पीपीपी तत्वावर आम्ही देत आहेत, PKG जाहीर करणार आहोत, ही योजना योग्य प्रकारे राबवली गेली तर अर्थ खात्यापुढे हात पसरावे लागणार नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
स्वारगेटसारखी घटना होऊ नये यासाठी
स्वारगेटसारखी घटना होऊ नये, यासाठी प्रत्येक बसमध्ये पॅनिक बटण, सीसीटीव्ही आणि जीपीएस असणे गरजेचे आहे, येणाऱ्या ज्या बसेस आहेत, त्यात पण अशा सुविधा असायल्या हव्या, येणाऱ्या काळात महिलांच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था चांगल्या असतील, पार्सल सुविधा हाय टेक करू, जेणेकरून गावकरून मुंबईकडे येणाऱ्या पार्सल माध्यमातून उत्पन्न वाढवता येईल. प्रताप सरनाईक हे एकटे करू शकणार नाही सर्व अधिकाऱ्यांची साथ हवी तरच हे शक्य आहे, एसटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रताप सरनाईक पुढे जाणार, सवलती बंद करण्याचा विचार नाही, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी ज्या सवलती सुरू केल्या त्या अजिबात बंद होणार नाहीत उलट त्यात वाढ होईल. श्रेयवादाची लढाई नाही, अजित पवारांचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचे महामंडळ प्रॉफिटमध्ये नाही, यासाठी मी जो निर्णय घेईन त्यासाठी अजित पवारांचा सपोर्ट असेल.मी दादांची मुलाखत बघितली, ते असे काहीही म्हणाले नाहीत, फडणवीस मला म्हणाले की, तुम्हीच एसटी पुढे नेऊ शकता, त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, असंही पुढे सरनाईकांनी म्हटलं आहे.
एसटी संदर्भात सर्व संघटनांशी आमची चर्चा
आम्ही स्क्रॅप पॉलिसी केली आहे, 2 ते अडीच हजार बसेस आम्ही स्क्रॅप करत आहोत, 3 हजार बसेसच्या निविदा काढायच्या आहेत, मग 5 हजार बसेसचे निविदा काढायचे आहे, जेणेकरून प्रत्येक महिन्याला अडीचशे तीनशे बसेस आम्हाला मिळतील, त्यामुळे जश्या या बसेस येतील तश्या जुन्या बसेस आम्ही काढून टाकू. उत्पन्न जे राज्य सरकार कडून येते ते वेळेवर येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आमचे प्रवासी 16 टक्क्यांनी वाढले आहेत, एसटी संदर्भात सर्व संघटनांशी आमची चर्चा झालेली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा करूनच आम्ही पुढे जाऊ, असा विश्वास देखील सरनाईकांनी यावेळी व्यक्त केला आहे.
पीएफचे पैसे आमच्या अधिकाऱ्यांनी उडवले नाहीत
पीएफचे पैसे आमच्या अधिकाऱ्यांनी उडवले नाहीत, फक्त त्या काळात परिस्थिती तशी होती, त्यामुळे ते पैसे वळवले, आता यापुढे आम्ही हे करणार नाही, आजच मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांच्या समोर बसणार आहे, प्रोटोकॉल सोडून मी तिकडे बसणार आहे, त्यांना सांगणार आहे की, आमचे पैसे, पगार वेळेत द्या. शंभर टक्के कर्मचारी पीएफ काढू शकतील, त्यांना गरज असेल तेव्हा ते पैसे त्यानं मिळतील, असेही ते म्हणालेत. सिंगल प्रवाशांचा विचार करून रिक्षा टॅक्सीची संघटना यांनी ही मागणी सोडून द्यावी, जवळच्या ठिकाणी जाण्यास तुमचे नुकसान होते, यासाठी बाईक चांगली आहे, तुमचेही नुकसान होणार नाही, आणि दोन प्रवासी असतील तर कोण बाईकवर जाईल. 80 टक्के काय शंभर टक्के परवाने आम्ही मराठी मुलांना देण्यास तयार आहोत, पण समोर यायला हवे, यात लाज शरम वाटण्याची शक्यता नाही, मराठी तरुणांनी लाज शरम वाटण्याची शक्यता नाही, मी रिक्षा चालवून इथपर्यंत आलो, एकनाथ शिंदे देखील आलेत, त्यात लाज वाटायची काय गरज आहे, असंही पुढे प्रताप सरनाईकांनी म्हटलं आहे.





















