टीमवर्कमधून समृद्ध गावांची निर्मिती शक्य; पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
22 मार्चच्या जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या “सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

मुंबई : जलक्रांतीतून हरित क्रांती येणार आहे आणि हरित क्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पिक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाऊंडेशन करत असल्याचं कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगत पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच शासन या सर्व कामात त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
22 मार्चच्या जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या “सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा” आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमात कृषी मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे याशिवाय पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक, राज्याच्या 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. त्याचे सुराज्यात रुपांतर करताना वसंत कानेटकरांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा गवताला भाले फुटण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यातूनच अडचणींवर मात करत समृद्ध आणि पाणीदार गावांच्या निर्मितीसाठीची जिद्द आपल्याला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पावसाचे वाहून जाणारे पाणी धरणे, कालवे या माध्यमातून साठवतांना त्याचा नियोजनबद्ध वापर होणे गरजेचे असते. यासाठी माथ्यापासून पायथ्यापर्यतच नाही तर मुळापर्यंत जाऊन करण्याची तयारी ठेवावी लागते. तीच तयारी पाणी फाऊंडेशनने केली, गावकऱ्यांना सोबत घेऊन, सोप्या साध्या भाषेत त्यांच्यापर्यंत यासंबंधीचे ज्ञान पोहोचवून त्यांनी काम केल्याचे प्रशांसोदगार ही मुख्यमंत्र्यांनी काढले.
खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करणार : आमीर खान
यावेळी बोलताना आमीर खान म्हणाला की, पाणीदार महाराष्ट्राचे स्वप्नं उराशी बाळगून पाच वर्षांपूर्वी पाणी फाऊंडेशनने महाराष्ट्रात काम सुरु केले. आता या कामाचा अधिक गावात विस्तार न करता काही निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळेच पाणी फाऊंडेशन सध्या फक्त 900 गावात काम करत असल्याचेही ते म्हणाले.
सहा विषयांवर लक्ष केंद्रीत
यावेळी किरण राव, डॉ. अविनाश पोळ यांनीही आपले या लोकचळवळीतील अनुभव सांगितले तसेच मृद व जलसंधारण, जलव्यवस्थापन, माती संवर्धन, पौष्टिक गवत संवर्धन, वृक्ष लागवड व प्रत्येक शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाखपर्यंत वाढवणे या सहा महत्वाच्या उद्दिष्टांवर आता पाणी फाऊंडेशन काम करत असल्याची माहिती ही दिली.
दक्षता समित्यांनी गावांची काळजी घ्यावी
कोरोनाने पुन्हा खुप मोठ्याप्रमाणात डोके वर काढले असल्याने गावागावात स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यांनी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे यासारख्या महत्वाच्या गोष्टींवर काम करावे, गावात कुणी विनामास्क फिरत असेल तर त्याला मास्क लावण्याची, त्रिसुत्रीचे पालन करायला लावण्याची शिस्त लावावी असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
Before You Go
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले





















