![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
वाशिमच्या अनसिंग पोलीस ठाणेदाराची मुजोरी, पोलीस स्टेशन हद्दीतील विहिरीत 200 कुटुंबांना पाणी भरण्यास मज्जाव
गेल्या 60 वर्षापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाणी भरतात. मात्र महिला अधिकारी पोहेकर यांनी विहिरीच्या आजूबाजूला जेसीबीच्या साह्याने मोठे खड्डे खोदल्याने पाणी भरण्यासाठी अडचणी होत आहे.
![वाशिमच्या अनसिंग पोलीस ठाणेदाराची मुजोरी, पोलीस स्टेशन हद्दीतील विहिरीत 200 कुटुंबांना पाणी भरण्यास मज्जाव Washim's Ansing police officer opposes filling water to 200 families in police station area वाशिमच्या अनसिंग पोलीस ठाणेदाराची मुजोरी, पोलीस स्टेशन हद्दीतील विहिरीत 200 कुटुंबांना पाणी भरण्यास मज्जाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/14/34f651d05072b6065adde8185c7f82f4_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वाशिम : तहानलेल्या गाढवाला गंगेचे पाणी पाजणाऱ्या एकनाथांनी शिकवलेल्या ईश्वरभक्तीचा विसर वाशिममधील महिला ठाणेदाराला पडला आहे. वाशीममध्ये ज्या विहिरीत इंग्रजानी पाणी भरण्यासाठी विरोध केला नाही, तिथे स्वतंत्र भारतातील प्रशासकीय यंत्रणेकडून विरोध होताना दिसत आहे. वाशीमच्या अनसिंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका 80 वर्ष जुन्या विहिरीच पाणी भरण्यासाठी महिला ठाणेदारांनी पाणी भरण्यासाठी मज्जाव केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे त्या अनसिंग परिसरातील 200 कुटुंबातील महिलांची पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.
वाशीमच्या अनसिंग पोलीस स्टेशनच्या हद्दीत इंग्रज काळातील 80 वर्ष जुनी विहीर आहे. या विहिरीने या परिसरातील लोकांची पाण्याची गरज गेल्या अनेक वर्ष भागवली. मात्र गेल्या मार्च महिन्यामध्ये महिला पोलीस अधिकारी नैना पोहेकर यांनी या ठाण्याचा पदभार स्वीकारला आणि तेव्हापासून परिसरातील 200 कुटुंबाचा पाणी पुरवठा त्यांनी बंद केला. त्यामुळे या परिसरातील गरीब गरजू महिलांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.
गेल्या 60 वर्षापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाणी भरतात. मात्र महिला अधिकारी पोहेकर यांनी गेल्या 4 महिन्यापूर्वी विहिरीच्या आजूबाजूला जेसीबीच्या साह्याने मोठे खड्डे खोदल्याने पाणी भरण्यासाठी अडचणी होत आहे. एवढंच काय तर महिला पाणी भरण्यासाठी आले तर गुन्हे दाखल करण्याची धमकीही अधिकारी देत असल्याचा आरोप इथल्या महिलांनी केला. तर गावच्या सरपंच संतोष खंदारे यांच्या म्हणण्याप्रमाणे गावात पाणी पुरवठा योजना आहे. मात्र त्या योजनेत पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात या हद्दीतील पाणी लोक भरतात त्याबद्दल ठाणेदार यांना सांगितल, मात्र कोणाताही तोडगा निघाला नाही.
गावातील पाणी पुरवठा योजना जुनी असल्याने आठ दिवसात एक वेळ पाणी मिळते. तर इतर वेळ विहिरीत किंवा विकतच पाणी घ्यावे लागते. जुन्या विहिरीच महिलांना पाणी भरण्यासाठी ठाणेदाराकडून मज्जाव झाल्याने गरीब गरजू महिलांना पायपीट करून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे महिलांनी नेमका किती दिवस हा त्रास सहन करायचा, असा प्रश्न महिलांना पडला. तर या बद्दल पोलीस अधिकाऱ्यांना याबद्दल विचारले असता पाणी दुषित असल्याचं कारण सांगत पाणी पिऊ नका असं सांगतात. तर हद्दीत प्रतिबंधित क्षेत्र आहे त्यामुळे मोकाट जनावरे येऊ नये हा हेतू असल्याचं सांगण्यात आलं. मी कुणाची अडवणूक केली नाही, असंही पोहेकर यांनी सांगितलं.
याबाबत जिल्हाधिकारी यांना तक्रार केली मात्र तोडगा निघाला नाही. म्हणून महिलांनी उद्यापासून उपोषणाचा इशाराही दिला आहे. अशा वेळेस अन्याय झाला तर सामन्य नागरिक पोलिसांकडे धाव घेतात. मात्र पोलीसच गुन्हा नोंदवायची धमकी देत असतील तर नेमका न्याय कुणाकडे मागायचं हा प्रश्न या गावातील नागरिकांना पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)