![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'कोरोना पाहुणा पाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका' : मुख्यमंत्री ठाकरे
CM Uddhav Thackeray Speech Live : कोरोना पाहुणा हातपाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं.
!['कोरोना पाहुणा पाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका' : मुख्यमंत्री ठाकरे CM Uddhav Thackeray Speech Live CM On Maharashtra Corona condition aarey metro car shed 'कोरोना पाहुणा पाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका' : मुख्यमंत्री ठाकरे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/25151706/uddhav-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना पाहुणा हातपाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले की, कोरोना पाहुणा जात नाही आहे. हातपाय पसरत आहे. शहरातून ग्रामीण भागात पसरतोय. परत लॉकडाऊन करावा लागेल असे आपल्याला वागायचे नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, मानवी त्वचेवर व्हायरस 9 तास राहतो. त्यामुळं नको तिथे हात लावू नका, तोंडाला लावू नका आणि सतत हात धुवत रहा. सार्वजनिक ठिकाणी, शौचालयातदेखील मास्क काढायचा नाही. मास्क घातलाच पाहिजे, योग्य पद्धतीनेच. तो गॉगल नाही, तोंडावर घाला. नाक, तोंड झाकुनच ठेवायला हवे. सर्वांनी! मास्क तोंडावर असला तरी डोळे उघडे ठेवा, समोरच्याचा मास्क नीट नसेल तर सांगा कारण तो कुठुनही शरीरात प्रवेश करु शकतो, असं ठाकरे यांनी सांगितलं.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिम यशस्वी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिम यशस्वीपणे राबवली जात आहे. विशेष करून आरोग्य यंत्रणा, आंगणवाड्या, सर्व कर्मचारी, महसुल विभागाचे आभार मानतो. सकाळपासुन संध्याकाळपर्यंत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे काम करतात, त्यांच्यासाठी आभार मानायला शब्द नाहीत. या सरकारी कर्मचाऱ्यांनी अनेकांचे जीव वाचवलेत. स्वत: आजारी पडले, लढुन बरे होऊन परत लढायला लागले, असं ठाकरे म्हणाले. सर्व यंत्रणांना मार्च पासून किती ताणाखाली काम कराव लागतंय विचार करा. त्यांना धन्यवाद. नागरिकांकडून अजून सहकार्य हवे आहे, असं ते म्हणाले.
आरेचं जंगल आता 800 एकरांचं तर मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार, मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा
जनतेने साथ देऊन चळवळ उभारली मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र कदाचित जगात एकमेव राज्य आहे जेथे जनतेने साथ देऊन ही चळवळ उभारली. स्वराज्य चळवळीने आपण इंग्रजांना घालवले, मग कोरोनाला घालवू शकणार नाही? असा सवाल त्यांनी केला. दुर्लक्ष करून तुम्ही स्वत:चा आणि कुटुंबियांचा जीव धोक्यात घालत आहोत. लक्षणे दिसल्यास टेस्ट करून घ्या. पॉझिटिव्ह आल्यास घाबरू नका, 100 वर्षांचे अगदी अन्य व्याधी असलेले देखील वेळेत आल्यास बरे झालेले उदाहरण आहे, असं त्यांनी सांगितलं.
गाफील राहु नका, कोरोनाचे बळी ठरु नका त्यांनी सांगितलं की, राज्यात व्हेंटिलेटरवर साधारणत: दोन - सव्वादोन हजार रुग्ण आहेत. काहीजण ऑक्सिजनवर आहेत. दुर्दैवाने 40000 मृत्यू झाले. काहींना सौम्य ते मध्यम लक्षणे आहेत. काही बरे होत आहेत तर काहींना संघर्ष करावा लागत आहे. विशेषत: ज्यांन कोमॉर्बिलिटी आहे जसे मधुमेह, रक्तदाब, स्थुलता अशा रुग्णांना धोका जास्त आहे. ते म्हणाले की, आपलं एक नात आहे, त्यावर सांगतो एक क्षणही बेसावध राहु नका, गाफील राहु नका. कोरोनाचे बळी ठरु नका. सुजाणपणे, सजगपणे आपण आयुष्य जगणार आहोत, कोरोनाला वगळून!
हे उघडलं ते का नाही? हे बोलणार्यांनो थांबा हे उघडलं ते का नाही? हे बोलणार्यांनो थांबा. तुमच्यावर जबाबदारी नाही, आमच्यावर आहे आणि आमचं जनतेवर प्रेम आहे, असा टोला त्यांनी टीका कऱणारांना लगावला. ज्या गोष्टी सुरू केल्या त्या युरोप, अमेरिका, इझरायल येथे परत काही प्रमाणात लॉकडाउन करत आहेत. मास्क नाही तर मोठा दंड लावला आहे. तशा गोष्टी आतातरी करायच्या नाहीत, असंही ते म्हणाले. जिल्हानिहाय बोलल्यावर काही चांगल्या गोष्टी आढळल्या. कोल्हापूर मध्ये 'मास्क नाही, प्रवेश नाही.' सूचना केली आहे. या अशा गोष्टी आपण अंगिकारल्या तर व्हॅक्सिन येईल तेंव्हा येईल परंतु सेल्फ डिफेन्स साठी मास्क हा आपला ब्लॅक बेल्ट म्हणून वापरणे हा उपाय आहे.
शेतकर्यांनो निश्चिंत रहा! वार्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शेतकरी वर्क फ्रॉम होम करू शकत नव्हता. ते कार्यरतच होते. सरकारने विविध कृषी संघटनांसोबत चर्चा केली. केंद्र सरकारच्या शेती संदर्भातील विधेयकाबद्दल चर्चा केली जातेय. त्याचे फायदे काय आणि फटके काय? सर्व वाईट असे नाही परंतु जे हिताचे नाही त्याबद्दल चर्चा करून मार्ग काढत आहोत, असं ते म्हणाले. कांद्यासाठी साठवणूक केंद्र, उद्या सोयाबीन, तुर, कापुस यासाठी स्टोरेज, शीत गोदामे हवी तिथे शीत गोदामे देण्यासाठी आपली वाटचाल सुरू आहे. 'विकेल त पिकेल' मध्ये अनेक शेतकरी सामिल होत आहेत. हमी भावच नाही तर हमखास भाव. शेतकरी पाणी, उन, पाऊस, कष्ट सर्वाचा विचार न करता काम करतो. त्यांना वार्यावर सोडणार नाही. पूर आलेल्या सर्व ठिकाणी आपण मदत देत आहोतच. हे सरकार तुमचं सरकार आहे, हक्काच सरकार आहे. शेतकर्यांनो निश्चिंत रहा!, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)