आज सांगतो, भांडण मिटवून टाकलं, पण एकच अट..., उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर ठेवलेली ती अट कोणती?
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर एकत्र येण्यासाठी एक अट ठेवली आहे.

Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि.19) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र येण्यासाठी साद घातली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही ऑफर स्वीकारण्यास होकार दिलाय. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली आहे. उद्धव ठाकरे कामगार सेनेतील एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी कोणती अट ठेवलीये? जाणून घेऊयात...
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं विधानही राज ठाकरेंनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी कोणती अट ठेवली?
उद्धव ठाकरे म्हणाले, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.
उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे...प्रत्येक कामगाराचा शाखेसोबत समन्वय झालाच पाहिजे...खूप जणांना काही देता नाही आला तरीसुद्धा ते हिंदुत्वासाठी आणि पक्षासाठी माझ्यासोबत राहिले...आज सुद्धा कायदे आणलेत कामगारांचे त्याला विरोध केलाच पाहिजे...पण निवडणुकीच्या वेळेला आपण विस्कळीत असतो.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही महाराष्ट्राचे मराठी कडवट आहोत. शेतकऱ्यांचे कार्य कायदे आले तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरला तसा कामगार रस्त्यावर उतरला नाही...त्यांचा मिशन हेच आहे की कोणी एकत्र आला नाही पाहिजे. आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून यांचे काय चाळे चालले आहेत ते पाहा...मुंबईत सुद्धा काही गोष्टी अदानीच्या कशात घालायच्या. आणि तुम्ही त्यावर बोलू नये म्हणून तुम्हाला भांडणात व्यस्त ठेवायचं...आता काय दुर्दैवाने सरकार आलं आहे ते आता जाहीरनाम्यावर काहीच कोणीच बोलत नाही. तुम्ही मारलेला थापा ऐकून मतदान केलं असं आपण एक वेळ म्हणू...पण त्यावर आता कोणीच बोलत नाही...
अजित पवार म्हणतात की माझ्या भाषणात कर्जमाफी कधी बोललो ते तुम्ही मला दाखवा...हे कोणतं राजकारण आहे..हिंदीची सक्ती पहिलीपासून याचा काय करायचं..? आम्ही प्रेमाने सर्व ऐकू पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकून देऊ...अनेक ठिकाणी मराठी शिकण्यासाठी उत्साह वाढत आहे...म्हणून त्यांना वाटलं तर आता हिंदी शिकवू या...महाराष्ट्रामध्ये मराठीचे सक्ती करण्याचा निर्णय हा माझ्या मंत्रिमंडळाने घेतला...जो महाराष्ट्रात राहिला त्याला मराठी ही आलीच पाहिजे...तुम्ही करता येते हिंदीची सक्ती आम्ही होऊ देणार नाही हा भाग वेगळा...इथे राहता आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















