Unseasonal Rain: वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं मराठवाड्याला झोडपलं; रब्बी पिकांसह फळ बागांना मोठा फटका, बळीराजा हवालदिल!
Maharashtra Weather Update : मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं अक्षरक्ष: झोडपलंय. या अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आहे.

Maharashtra Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर पुढील काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain) अजून गडद होण्याची शक्यता आहे. अशातच मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं अक्षरक्ष: झोडपलंय. यात हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये काल (3 एप्रिल) सायंकाळच्या सुमारामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
या अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आहे. वाई गोरक्षनाथ गावाच्या शिवारामध्ये प्रल्हाद जाधव या शेतकऱ्यांने पाच एकरवर पपईच्या बागेची लागवड केली होती. त्यातील पाच एकरमध्ये चार हजार पपईच्या झाडांची लागवड करत असताना त्यांना सहा लाख रुपये खर्च आला होता. आता प्रत्येक आठवड्याला पपईची फळ विक्री केली जात होती. परंतु काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे संपूर्णपणे पपईची फळबाग जमीन दोस्त झाली आहे. काहीच वेळात शेतकऱ्याच्या पपईच्या बागेच होत्याच नव्हतं झालंय. विक्रीलायक तयार झालेली पपईची फळ तुटून जमिनीवर पडली आहेत शेतकरी प्रल्हाद जाधव यांना पपईच्या बागेमधून वीस लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होतं. परंतु आता झालेल्या वादळ आणि अवकाळी पावसाने संपूर्णपणे शेत उध्वस्त झाले आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार शिरीष नाईक यांनी केली पाहणी
दरम्यान, नंदुरबारच्या अनेक भागातही वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार शिरीष नाईक यांनी पाहणी केलीय. आमदार नाईक यांनी ठाणेपाडा आणि परिसरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत माहिती जाणून घेतली. तसेच लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना आदेश ही यावेळी दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांनी केली आहे.
नाशिक शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा
नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने सातपूर फिडर सब स्टेशनमध्ये बिघाड झाल्यान आज (4 मार्च) महावितरणच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. देखभाल दुरुस्तीमुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने केला जाणार आहे. आधीच शहरात पाणी टंचाई जाणवत असताना त्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.
हे ही वाचा






















