Samarjeetsinh Ghatge : चलो कागल, वस्ताद येत आहेत, मैदान तेच पण डाव नवा; समरजित घाटगेंकडून तुतारीवर शिक्कामोर्तब
कागलच्या हितासाठी जो निर्णय घ्यायला लागेल तो निर्णय घेण्यासाठी तयार असल्याचं सांगत समरजित घाटगे यांनी आगामी विधानसभेला तुतारी फुंकण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं.
![Samarjeetsinh Ghatge : चलो कागल, वस्ताद येत आहेत, मैदान तेच पण डाव नवा; समरजित घाटगेंकडून तुतारीवर शिक्कामोर्तब Samarjeetsinh Ghatge has confirmed that NCP Sharad Chandra Pawar will join the party in kagal on 3 sept Samarjeetsinh Ghatge : चलो कागल, वस्ताद येत आहेत, मैदान तेच पण डाव नवा; समरजित घाटगेंकडून तुतारीवर शिक्कामोर्तब](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/58704d8e62a55d3a625898f41920878a1724942341517736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेते आणि माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी भाजपला अधिकृत रामराम केला आहे. त्यांनी आज (29 ऑगस्ट) सोशल मीडियातून अधिकृत घोषणा करताना शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. कागलमध्ये घेतलेल्या मेळाव्यात पुन्हा एकदा आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे. कागलच्या हितासाठी जो निर्णय घ्यायला लागेल तो निर्णय घेण्यासाठी तयार असल्याचं सांगत समरजित घाटगे यांनी आगामी विधानसभेला तुतारी फुंकण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. समरजित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्याचेही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे सांगितले होते.
इथून पुढे तुम्हाला त्रास होणार, सरकारी ताकद लावली जाईल
दरम्यान, हा निर्णय घेत असताना माझ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो असल्याचेही समरजित घाटगे म्हणाले होते. नेत्यांना सांगून करण्यासाठी धमक लागते. प्रेम केलं तर तन-मन-धन करून करायचं. इथून पुढे तुम्हाला त्रास होणार, सरकारी ताकद लावली जाईल, पण हा समरजित तुमच्या पाठीशी असल्याचे ग्वाही कार्यकर्त्यांना दिली होती. सरकारी ताकद केवळ दोन महिने राहणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना इशारा दिला आहे.
माझ्या आणि शरद पवार साहेबांच्या भेटी झाल्या
दरम्यान समरजित घाटगे पुढे म्हणाले की, 2019 मध्ये आपली तयारी नव्हती, पण आपण लढलो. आता विषय माझा नाहीतर कागलचा आहे. माझ्या आणि शरद पवार साहेबांच्या भेटी झाल्या. मला विचार करण्यास सांगितलं. मी कागलच्या जनतेला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही, असा निरोप त्यांना दिला होता. ते म्हणाले की आज जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागावं लागेल. लोकांना समजावून सांगा समरजितला मत का करायचं, असंही घाटगे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)