Deepak Kesarkar : शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यावर राजकारण असतं, आम्ही जे काम करतो ते बांधावर जाऊन सुटत नाही; दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. मात्र, काही जणांकडून शंभर टक्के राजकारण केलं जात आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (8 सप्टेंबर) अहमदनगरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करताना त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या. यानंतर आता शिंदे गटाकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. बांधावर जाण्यवर देखील राजकारण असतं, अशी टीका शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.
काही जणांकडून शंभर टक्के राजकारण
ते म्हणाले की, आम्ही जे काम करतो ते बांधावर जाऊन सुटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. मात्र, काही जणांकडून शंभर टक्के राजकारण केलं जात आहे. बांधावर पाणी गेलं पाहिजे यासाठी आम्ही काम करतो यालाच शिंदे फडणवीस आणि पवार यांचं सरकार म्हणतात. राजकारण कोणीही करू दे आम्ही कटिबद्ध आहोत. नियोजन हे नियोजन असतं ते करावं लागतं आणि यासाठी शिंदे साहेबांनी रात्रंदिवस मीटिंग घेतल्या आहेत. केवळ आपण काय तरी दाखवायचं आणि मीडियासमोर जायचं असं मर्यादित काम असू नये यासाठी शिंदे फडणवीस आणि अजितदादा काम करत आहेत.
तर फडणवीस यांना धारेवर धरणे याला राजकारण म्हणतात...
केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षणावरून पाठराखण केली. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवून दाखवलं, त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. एखाद्या पोलिसांकडून चूक झाली तर फडणवीस यांना धारेवर धरणे याला राजकारण म्हणतात. भाजपच्या आढावा बैठकीवर त्यांनी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, तुमच्या बैठका झाल्या नाहीत का? इंडिया बैठक तर पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. मात्र त्यावर आम्ही टीका केली नाही. दुष्काळ आला तरी इलेक्शन घ्यावंच लागेल. मात्र, याचा परिणाम आपल्या कामावर होता कामा नये. ज्यांना राजकारण करायचं आहे ते बातम्या देतात. काम करणाऱ्या माणसांवर टीका केली तरी त्याचे उत्तर कामाने दिले पाहिजे.
"हा एक कटाचा प्रकार"
मराठा समाजासारखा मॅच्यूअर समाज भारतात कोणताही नाही. आंदोलकांना काहीही होऊ नये यासाठी त्यांना दवाखान्यात दखल करण्याची बाब होती. दुपारी अॅडमिट करण्यासाठी पोलीस आंदोलन स्थळे गेले तेव्हा तेथे कोणीतरी दगडफेक केली. हा कट रचल्याचा प्रकार आहे. लाखाचे मोर्चे निघाले तेव्हा दगडफेक झाले नाही. मग आता कशी होईल याचा विचार जनतेने करावा. मराठा समाजावर लाठीमार झाल्याने पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली. मात्र, तिथे देखील काही जणांकडून राजकारण करण्यात आले. आम्हाला जरंडे पाटील यांच्या तब्बेतीची काळजी आहे. जे गुन्हे दाखल झालेले असतात ते मागे देखील घेण्यात येतात. त्यासाठी एक कमिटी असते. मी जेव्हा गृह खात्याचा राज्यमंत्री होतो तेव्हा 90 टक्के खटले मागे घेण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Before You Go
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज























