PM Modi Speech: स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींचं 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्त्वाचं भाष्य, 1 लाख तरुणांना राजकारणात आणण्याची योजना
PM Modi Speech at Red Fort: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरुन भाषण. आगामी काळात देशात मोठे बदल होण्याचे संकेत. देशात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता. एक देश, एक निवडणूक धोरणाबाबत महत्त्वाचं भाष्य

नवी दिल्ली: देशभरात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुका या देशाच्या प्रगतीत अडथळा बनत आहेत. त्यामुळे देशाच्या विकासात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण देशाने 'एक देश, एक निवडणूक' (One Nation One Election) हे धोरण अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केले. त्यांनी गुरुवारी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 'वन नेशन, वन इलेक्शन' धोरणाबाबत केलेले वक्तव्य आगामी काळाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. तब्बल 97 मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. मात्र, त्यांच्या भाषणातील सेक्युलर सिव्हिल कोड आणि वन नेशन, वन इलेक्शन हे दोन मुद्दे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले.
पंतप्रधान मोदी यांनी देशात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुकांबाबत भाष्य करताना म्हटले की, देशात कोणतीही योजना राबवायला गेले की त्याचा संबंध निवडणुकीशी जोडला जातो. निवडणूक आली म्हणून योजना आली, असे बोलले जाते. एकूणच सगळ्या गोष्टींचा संबंध निवडणुकीशी जोडला जातो. यादृष्टीने One Nation One Election या धोरणाबाबत व्यापक चर्चा झाली आहे. राजकीय पक्षांनी याबाबत आपले विचार मांडले आहेत. एका समितीने याबाबत चांगला अहवाल मांडला आहे. आता संपूर्ण देशाने वन नेशन, वन इलेक्शनसाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे. भारतातील स्रोतांचा वापर जास्तीत जास्त सामान्य लोकांसाठी करता यावं, त्याचा अपव्यय कमी व्हावा यासाठी देशात वन नेशन, वन इलेक्शन धोरणाची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे.
आता देशाने सेक्युलर सिव्हिल कोड स्वीकारला पाहिजे: पंतप्रधान मोदी
आपला देश 75 वर्षे कम्युनिल सिव्हिल कोडमध्ये राहिला आहे. यामध्ये आता बदल झाला पाहिजे. आता आपण सेक्युलर सिव्हिल कोडच्या दिशेने जायला पाहिजे. जेणेकरुन यापुढे देशात धर्माच्या आधारे होणाऱ्या भेदभावापासून मुक्ती मिळेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
1 लाख तरुणांना राजकारणात आणणार: मोदी
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला. देशातील घराणेशाही, जातीयवाद भारताच्या लोकशाहीचे नुकसान करत आहे. यापासून देशाला मुक्ती मिळाली पाहिजे. त्यासाठी एक मिशन हाती घेतले जाणार आहे. या मिशनअंतर्गत देशातील राजकारणात 1 लाख तरुणांना पुढे आणले जाईल. या तरुणांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसेल, त्यांचे वडील, काका किंवा मामा कोणीही राजकारणात नसेल. हे तरुण जिल्हा परिषद, पंचायत, विधानसभा किंवा लोकसभा कुठेही काम करतील. या तरुणांनी कोणत्या पक्षात यावे, याची सक्ती नाही. ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. मात्र, यामुळे देशाला घराणेशाही आणि जातीयवादापासून मुक्ती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
VIDEO: पंतप्रधान मोदी यांचं लाल किल्ल्यावरील भाषणात महत्त्वपूर्ण वक्तव्य
आणखी वाचा
पूर्वी देशात सरकार मायबाप होतं, नागरिकांना हात पसरावे लागायचे, आम्ही प्रशासनाचं मॉडेल बदललं: मोदी
Before You Go
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!






















