India Corona Updates : 6 दिवसांनी देशात 30 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, तर 389 रुग्णांचा मृत्यू
India Corona Updates : गेल्या 24 तासांत 25,072 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 389 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

India Coronavirus Updates : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. सहा दिवसांनी 30 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 25,072 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 389 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी 25,166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच 24 तासांत 44,157 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
केरळमध्ये रविवारी कोरोना व्हायरसच्या 10,402 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच, देशातील एकूण दैनंदिन आकड्यापैकी 40 टक्के रुग्ण केवळ केरळातील आहेत. काल दिवसभरात 66 रुग्णांचा केरळात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर केरळात आतापर्यंत 38 लाख 14 हजार 305 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
देशातील कोरोनाची एकूण आकडेवारी
कोरोना प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 24 लाख 49 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 34 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 80 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 33 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशातील सध्याची कोरोनास्थिती :
कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 24 लाख 49 हजार 306
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 16 लाख 80 हजार 626
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 33 हजार 924
एकूण मृत्यू : चार लाख 34 हजार 756
एकूण लसीकरण : 58 कोटी 25 लाख 49 हजार लसीचे डोस
राज्यात काल (रविवार) 4141 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4780 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल (रविवार) 4,141 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 780 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 31 हजार 999 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे.
राज्यात काल (रविवार) 145 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 53 हजार 182 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,069 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नंदुरबारमध्ये रुग्णसंख्या शून्यावर आहे. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (40), नंदूरबार (0), धुळे (8), परभणी (14), हिंगोली (79), नांदेड (39), अमरावती (95), अकोला (17), वाशिम (10), बुलढाणा (41), यवतमाळ (11), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (3), गडचिरोली (24) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
धुळे, जळगाव, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 22,92,131 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,24, 651 (12.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,12,151 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,526 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 294 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 294 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 240 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,902 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2877 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2030 दिवसांवर गेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- देशात पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट, दरदिवशी 4 ते 5 लाख रुग्ण वाढण्याची भिती, नीती आयोगाचा इशारा
- कोविडचा बूस्टर डोस देण्याचा केंद्र सरकारचा अद्याप विचार नाही : निती आयोग
Before You Go
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल






















