Heat Wave In India : पुढच्या वर्षी उन्हाचा तडाखा आणखी वाढणार, मार्चमध्येच उष्णतेची लाट येण्याची शक्यता
Heat Wave In India : पुढील वर्षी वातावरण बदलामुळे भारत आणि पाकिस्तानात उष्णतेची लाट ही अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजेच मार्च महिन्यात येण्याची शक्यता 30 पटींनी वाढली आहे.

Heat Wave In India : देशासह राज्यात तापमानाचा पारा यंदा चांगलाच वाढला. या वर्षी अनेक शहरात उष्णतेची लाट (Heat Wave) आली. उष्णतेची लाट येण्याचं कारण म्हणजे वातावरणात अचानक झालेला बदल होय. आता वातावरण बदलामुळे भारत आणि पाकिस्तानात उष्णतेची लाट ही अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजेच मार्च महिन्यात येण्याची शक्यता 30 पटींनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय हवामान वैज्ञानिकांच्या गटाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतात उष्णतेची लाट ही सामान्य बाब आहे. मात्र यंदाचा उन्हाळा उन्हाच्या बाबतीत विक्रमी ठरला. गेल्या अनेक वर्षांमधील तापमानाचा उच्चांक यंदाच्या वर्षी देशाने गाठला. वायव्य भारत आणि आग्नेय पाकिस्तानच्या सर्वाधिक परिणाम होणार्या भागांतील मार्च आणि एप्रिलमधील दैनंदिन तापमानावर लक्ष केंद्रित केले तर दीर्घकाळ चालणार्या उष्णतेच्या लाटेसारख्या नैसर्गिक घटनांची शक्यता आहे. मानवी हस्तक्षेपामुळे होणार्या वातावरण बदलामुळे ही शक्यता 30 पटींनी वाढली आहे. जोपर्यंत हरितगृह वायूंचे उत्सर्जन थांबवण्यात येत नाही तोपर्यंत जागतिक तापमानवाढ होतच राहिल आणि अशा घटनांमध्ये वाढ होईल, असे आंतरराष्ट्रीय हवामान वैज्ञानिकांच्या गटाकडून केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
भारत, पाकिस्तान, डेन्मार्क, फ्रान्स, नेदरलॅंड, न्यूझिलॅंड, स्वित्झर्लंड, इंग्लंड आणि अमेरिकेतील हवामानविषयक संस्था आणि विद्यापीठांच्या 29 संशोधक शास्त्रज्ञांचा समावेश होता. भारत आणि पाकिस्तानात दीर्घकाळ चालणारी उष्णतेच्या लाटेचा परिणाम मानवी शरीरासोबतच गव्हाच्या उत्पादनावरही होणार आहे. गेल्या 122 वर्षांतील सर्वाधिक जास्त उष्णतेची लाट मार्च महिन्यात भारताने अनुभवली आहे. त्याच वेळी पाकिस्तानातही एप्रिल महिन्यात उष्णतेची तीव्रता वाढल्याने विक्रमी तापमानची नोंद झाली. नव्वदहून अधिक नागरिकांनी उष्माघाताने आपले प्राण गमावले आणि या आकड्यांत आणखी वाढ होण्याची भीती आहे.
तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे पीकावरही त्याचा परिणाम झाला या सगळ्याचा पुरवठा साखळीवरही परिणाम झाला. उष्णतेच्या लाटेचा गव्हाच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला. गव्हाच्या उत्पादनात घट झाल्यानं भारताकडून निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारातही गव्हाच्या किंमती वधारल्या. युक्रेन-रशिया युद्धामुळे गव्हाच्या मागणीत तयार झालेल्या पोकळीत भारताकडून एक कोटी गहूची निर्यात करणं अपेक्षित होतं, मात्र तसे न झाल्याने किंमती वाढल्या आहे
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट























