Bird Flu | देशातील सात राज्यांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूने खळबळ, चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न
देशातील चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

नवी दिल्ली : कोरोना पाठोपाठ देशात बर्ड फ्लूच्या संकटानं पाऊल ठेवलं आहे. देशातील 7 राज्यांमध्ये पक्षांच्या मृत्यूमुळे सर्वांची झोप उडाली आहे. जम्मू-काश्मीर आणि तमिळनाडूमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हिमाचल, मध्यप्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लू पसरला आहे. कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हरियाणातील पंचकूलामध्ये मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तपासणीसाठी सॅम्पल जालंधर आणि भोपाळमध्ये पाठवण्यात आले आहेत. तर केरळमध्ये बर्ड फ्लूला आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 30 हजारांहून अधिक कोंबड्या आणि बदकांना मारण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
हरियाणातील पंचकूलामध्ये 10 दिवसांत 4 लाखांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू
देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या एच5एन8 स्वरूप (स्ट्रेन)ला नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी अलर्ट जारी करण्यात आला असून तपासणीसाठी नमूनेही पाठवण्यात आले आहेत. तर केरळमध्ये कोंबड्या आणि बदकांना मारण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हरियाणातील पंचकूला जिल्ह्यातील एका पोल्ट्री फर्ममध्ये गेल्या 10 दिवसांत चार लाखांहून अधिक पोल्ट्रीमधील पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितलं की, जालंधरमधील स्थानिक रोग तपासणी प्रयोगशाळेत एका टीमने पक्ष्यांचे नमूने एकत्रित केले आहेत. तसेच केरळमध्ये बर्ड फ्लूच्या एच5एन8 स्वरूप (स्ट्रेन) ला नियंत्रणात ठेवण्यासाठी कोंबड्या आणि बदकांना जीवेमारण्यास सुरुवात केली आहे. तर हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच प्रवासी पक्ष्यांचे नमुने गोळा करण्यासही सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेश
देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव पाहता लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी आरोग्य विभाग आणि पशुपालन विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
पंजाब
पंजाबमधील तरणतारणमध्ये असतेल्या हरीके पट्टन बर्ड सेंच्युरीमध्ये वन विभागाने कडक पहारा देण्यास सुरुवात केली आहे. येथे दरवर्षी एका लाखांहून अधिक प्रवासी पक्षी येतात. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये असलेल्या गोविंद सागर आणि कोल डॅममध्ये प्रवासी पक्ष्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.
राजस्थान
राजस्थानच्या बारांमध्ये 100 हून अधिक पक्ष्यांचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाला आहे. त्यानंतर वनविभागाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. राजस्थान सरकारने सांगितलं की, आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेल्या बाबींनुसार, मानवासाठी धोका नाहीये.
हिमाचल
हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात पोंग तलावाजवळ आतापर्यंत 2300 प्रवाशी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तपासादरम्यान, बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. सर्व पक्ष्यांना जमिनीमध्ये दफन करण्यात आलं आहे.
मध्यप्रदेश
मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये एका आठवड्यात 2500 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. यांचे नमूने भोपाळमध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या कावळ्यांना बर्ड फ्लू झाल्याचं निष्पन्न झालं असून राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- बर्ड फ्लूची लक्षणं अन् कारणं; avian influenza व्हायरस माणसांसाठीही धोकादायक?
- कोरोनामागोमाग देशावर 'बर्ड फ्लू'चं संकट; 'या' राज्यांत सतर्कतेचा इशारा
- सध्याच्या परिस्थितीत पोल्ट्री उत्पादनं खरेदी, सेवन करणं सुरक्षित आहे का?
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके



















