एक्स्प्लोर
बिहारमध्ये चमकी तापाचा कहर सुरुच, आतापर्यंत 132 मुलं दगावली, मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान नागरिकांचा रोष
पटना येथून मुजफ्फरपूर केवळ 80 किमी अंतरावर असतांना देखील नीतीश कुमार यांनी नऊ दिवसांनंतर रुग्णालयाला उशिरा भेट दिल्याने लोकांचा संताप अनावर झाला होता. यावेळी नितीशकुमारांच्या विरोधात नागरिकांनी घोषणाबाजी देखील केली.

पाटना : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये चमकी तापाने आतापर्यंत 132 मुलं मृत पावली आहेत. तर 414 मुलं या तापाने पीडित असल्याने दवाखान्यात भर्ती आहेत. या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि बिहार सरकारला निर्देश देत उपाययोजनांबाबत विचारणा केली आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हे मुजफ्फरपूर या घटनेचा आढावा घेण्यासाठी येथे पोहोचले. यावेळी नागरिकांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला. पटना येथून मुजफ्फरपूर केवळ 80 किमी अंतरावर असतांना देखील नीतीश कुमार यांनी नऊ दिवसांनंतर रुग्णालयाला उशिरा भेट दिल्याने लोकांचा संताप अनावर झाला होता. यावेळी नितीशकुमारांच्या विरोधात नागरिकांनी घोषणाबाजी देखील केली. दरम्यान बिहारच्या आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांनी घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा स्कोअर विचारल्याने देखील संताप व्यक्त केला जात आहे. याच आरोग्यमंत्र्यांनी हे मृत्यू नियती आणि निसर्गामुळे होत असल्याचे वक्तव्य देखील केले होते. दरम्यान, बिहारचे मुख्य सचिव दीपक कुमार यांनी म्हटले आहे की, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी चमकी तापाच्या प्रकोपापासून मुलांना वाचविण्यासाठी सर्वोत्तम उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पेशंटला उशिरा दवाखान्यात आणले गेल्यामुळे अधिकांश मृत्यू होत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. दवाखान्याचा खर्च भागविण्यासाठी बऱ्याच पेशंटची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे त्यांना पैशांची देखील व्यवस्था केली जाणार आहे. सध्या SKMCH या मुजफ्फरपूरमधील दवाखान्यात सर्वाधिक पेशंट आहेत. या दवाखान्यात 2500 बेडची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या SKMCH मध्ये 610 बेड आहेत. काय आहेत चमकी तापाची लक्षणे? एन्सेफलायटीस सिंड्रोम अर्थात चमकी तापाने शरीराच्या मज्जासंस्थावर थेट परिणाम होतो. खूप ताप आल्यानंतर शरीराच्या न्यूरोलॉजिकल सिस्टमवर परिणाम होतो. परिणामी रोग्यांची चिडचिड होतो आणि मानसिक समतोल बिघडतो. हा रोग सामान्यतः पावसाळ्याच्या आरंभीला उद्भवतो. जून ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये हा ताप डोके वर काढतो. हा ताप मुख्यत: लहान मुलांसाठी अधिक धोकादायक आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















