Manoj Jarange Patil : ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाय, आता मैदान सोडायचं नाही; बीडमधून मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
Manoj Jarange Patil : माझा समाज मोठा होऊ नये यासाठी सर्व जण एकवटले आहेत. जातीच्या लढाईत 29 तारखेला उतरायचे आहे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत (Mumbai Morcha) धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची आज रविवारी (दि. 24) निर्णायक इशारा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय.
मनोज जरांगे म्हणाले की, बीडचे मराठे एकत्र येत आहेत. गडबडीने समाजाचे वाटोळं होत आहे. आता पुढचा काळ लढायचा आहे. समाजाला आवाहन आहे की, आपली ताकद मोठी आहे. आता विचार करून पुढे लढायचे आहे. बीडचे रूप पाहून सरकार बेजार होईल. 29 तारखेला चलो मुंबई... आपल्याला शांततेत जायचं आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केला.
फडणवीस साहेब मी मुंबईत येतोय
आम्ही शांततेत आरक्षण मागत आहोत. बीडमध्ये तुम्हाला दंगल घडवायची होती का? सत्ता बदलणार आहे. त्यावेळी आम्ही नक्की लक्षात ठेवू, असा इशारा त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. पोलीस देवेंद्र फडणवीस यांचं ऐकतात आणि आम्हाल त्रास देतात. सत्ता पालट झाली तर मी सोडणार नाही. फडणवीस साहेब मी मुंबईत येत आहे. तुमच्या घरा बाहेर येत आहे. विनाकारण डवचू नका, मराठा शांत आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मुंबईला येण्याची हौस नाही
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, पोलिसांना आम्ही त्रास दिला नाही. आरक्षण दिले नाही तर... मुंबईत गेल्यावर सांगतो... आता सरकारची पळापळी सुरू झाली आहे. मुंबईला येण्याची हौस नाही. आमचा प्रश्न मार्गी लावा. आम्ही मुंबईला येणार नाही. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. महादेव मुंडे यांच्या हत्येचे मारेकरी पकडून दाखवा, असे आव्हान त्यांनी यावेळी सरकारला दिले.
जाळपोळ करणारी पैदास आपली नाही
29 ऑगस्ट मुंबईला जायचं आहे. 27 तारखेला अंतरवाली सराटीवरून निघायचं आहे. यावेळी मान खाली जाईल, असं काहीही करू नका. आपल्याला दगडफेक जाळपोळ करायची नाही. मुंबईला शांततेत जायचं आहे. कोणी जाळपोळ केलीच तर एकानेही पळायचं नाही. जाळपोळ करणारी पैदास आपली नाही. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले आहे. त्यांनी पाठवलेले लोक दगडफेक करतील. पण, आपण तसे करायचे नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी मराठा समाजाला केले.
ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाय
बीड जिल्ह्यातील समाजाने घरी थांबायचं नाही. ही शेवटची फाईट आहे. विजयाचा गुलाल लावायचा आहे. आता माघार नाही. मैदान सोडायचं नाही. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्यांना सांगायचे. तसेच सर्वांना सांगायचं की, मुंबईला जायचे आहे. डॉक्टर, श्रीमंत मराठे एवढ्या वेळी तुमच्या गाड्या मुंबईला जाण्यासाठी द्या. नेत्या मागे पळू नका. राजकीय नेत्याला बळी पडून मुंबईला येण्यासाठी थांबवू नका. माझा समाज मोठा होऊ नये यासाठी सर्व जण एकवटले आहेत. जातीच्या लढाईत 29 तारखेला उतरायचे आहे. मुंबईत खेकड्या सारखे दगड आहेत. मुंबईत एकदा गेलोच तर नक्की आरक्षण मिळणार, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आणखी वाचा























