Crop Insurance Scam : खरीपसोबतच आता रब्बी हंगामात देखील पीक विमा घोटाळा; कृषी विभागाने दिले महत्वाचे आदेश
Crop Insurance Scam : बीड जिल्ह्यामध्ये रब्बी क्षेत्रावर सव्वातीन लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, यामध्ये पाच लाख हेक्टर क्षेत्राचा पिक विमा भरल्याचं उघडकीस आले आहे.

बीड : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यात बोगस पीक विमा भरल्याचे प्रकार समोर येत आहे. अनेकांनी यात घोटाळा करत चक्क शासकीय जागेवर देखील विमा काढल्याचे घटना उघडकीस आले होते. त्यामुळे, रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळेल, पण यासोबतच बोगस पीक विमा भरणाऱ्यांचे अर्ज बाद करण्याचे आदेश कृषी विभागाने (Agriculture Department) विमा कंपनीला दिले आहेत. विशेष म्हणजे, बीड जिल्ह्यामध्ये रब्बी क्षेत्रावर सव्वातीन लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, यामध्ये पाच लाख हेक्टर क्षेत्राचा पिक विमा भरल्याचं उघडकीस आले आहे. त्यामुळे पीक विमा घोटाळ्याच्या (Crop Insurance Scam) पार्श्वभूमीवर कृषी विभाग अलर्ट झालं आहे.
बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात देखील शासकीय जमिनीचा पीक विमा भरून अनेकांनी शासनाची फसवणूक करून, पीक विमा उचलला होता. तर, आता पुन्हा रब्बी हंगामात देखील पिकाची पेरणी नसतानाही अनेक शेतकऱ्यांनी त्या पिकाचा पीक विमा भरल्याच उघड झालं आहे. त्यामुळे, शेतात पिकांची लागवड नसतानाही विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यात पीक विमा घोटाळ्याचे रॅकेट
दरवर्षी अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता सरकारने 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती. मात्र, याचाच फायदा घेत काही भामट्यांनी बोगस पीक विमा भरून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यात असे अनेक प्रकरण खरीप हंगामात समोर आले होते. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव येथे असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 94 एकर जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून पीक विमा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे, ज्या जमिनीवर हा पीक विमा काढण्यात आला आहे, ती जमीन शासनाच्या रेकॉर्डवर अकृषी म्हणून दाखवण्यात आलेले आहेत. तर, याच जमिनीवर सहकारी बँकेचे कर्ज देखील आहे. तरीही बनावट दस्तऐवज तयार करून या व्यक्तीने पीक विमा भरला होता. अशाच प्रकारे बीडच्या नगर परिषदेची जागा गायरान जमीन दाखवून, त्यावर देखील तेलंगणातील एका शेतकऱ्याने पीक विमा भरल्याची बाब समोर आली होती. आता रब्बी हंगामात देखील असेच प्रकार समोर येत आहे.
केवळ 200 रुपयांत 14 कोटी पेक्षा अधिकचा विमा
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पठ्ठ्याने स्वतःची तब्बल साडेचार हजार हेक्टर अर्थात 11 हजार एकर जमीन असल्याचे दाखवत 23 जिल्ह्यांमध्ये 200 ठिकाणी पीक विमा भरल्याचा देखील प्रकार समोर आला होता. विशेष म्हणजे केवळ 200 रुपयांच्या विमा रकमेत त्याला तब्बल 14 कोटी पेक्षा अधिक विम्याची रक्कम मिळणार होती. पीक कृषी विभागाने केलेल्या चौकशीनंतर हा सर्व प्रकार समोर आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
