Aurangabad: विद्यापीठातील शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद; पुतळा चुकीच्या दिशेने बसवल्याचा आरोप
Aurangabad: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य दिशेने उभारण्यात यावा अशी मागणी 'दि आंबेकराइट मुव्हमेंट' या संघटनेने केली आहे.

Aurangabad News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावराच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत लोकप्रतिनिधींचे नाव न टाकल्याने वाद समोर आला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्याचे लोकार्पण केले म्हणून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याचं दुग्धाभिषेक केल्याने पुन्हा नवीन वाद उभा राहिला होता. त्यातच आता शिवरायांचा पुतळा चुकीच्या दिशेने बसवल्याचा आरोप करण्यात आल्याने आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य दिशेने उभारण्यात यावा अन्यथा या प्रश्नी आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा 'दि आंबेकराइट मुव्हमेंट' या संघटनेने दिला आहे.
याप्रकरणी दि आंबेकराइट मुव्हमेंट संघटनेने विद्यापीठ प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटल आहे की, विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर शिवरायांचा पुतळा उभारतांना विद्यापीठ प्रशासनाने गंभीर स्वरूपाच्या चूका केल्या आहेत. असं करून विद्यापीठ प्रशासनाने एक प्रकारे छत्रपतींचा अपमानच केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उत्तरेकडे तोंड करूनच उभारण्यात येतो, भारतामध्ये उभारण्यात आलेला छत्रपतींचा कोणताही पुतळा अशाच पद्धतीने उभारलेला आहे.
अन्यथा आंदोलन केले जाईल...
दिल्लीचे तख्त काबीज करणे हे शिवाजी महाराजांच्या उत्तरेवरील स्वारीचे उद्दिष्ट होते म्हणून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे तोंड हे उत्तर दिशादर्शक असावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रतिमा आणि उद्दिष्ट जर आपणास माहीतच नव्हते तर विद्यापीठ परिसरा बाहेरील तज्ञ व्यक्तींशी सल्ला मसलत करून हा पुतळा योग्य दिशेने उभारता आला असता. त्यामुळे याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य दिशेने उभारण्यात यावा. अन्यथा या प्रश्नी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असेल, असा इशारा यावी देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या...
पत्रिकेत नाव डावलल्यानंतर दानवे विद्यापीठात; कुलगुरुंविरोधात हक्कभंग, कुलगुरू म्हणतात 'नो कमेंट'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
