Ahmednagar News : साखर-डाळ वाटून सुजय विखे मतं मिळवताय, संजय राऊतांची टीका; भाजपकडून लाडू पाठवत अनोख्या पद्धतीने उत्तर
Ahmednagar News : खासदार सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात वाटलेल्या साखर-डाळ वाटपावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेला भाजपच्या पदाधिकार्याने अनोख्या पद्धतीने उत्तर दिले आहे.

Ahmednagar News अहमदनगर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी नगर जिल्ह्यात वाटलेल्या साखर-डाळ वाटपावर टीका केली होती. खासदार विखे हे साखर आणि डाळ वाटून आता लोकांकडे मतं मागत आहेत आणि लोक त्यांना मत देत आहेत. हे थांबले पाहिजे, शिवसेनेने (Shivsena) थांबवले पाहिजे, असे त्यांनी अहमदनगर येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) पदाधिकारी मेळाव्यात म्हटले होते.
या टीकेला भाजपच्या (BJP) पदाधिकार्याने अनोख्या पद्धतीने उत्तर दिले आहे. भाजपचे नगर शहर जिल्हाउपाध्यक्ष धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी खासदार विखे आणि कुटुंबियांनी नगर जिल्ह्यात वाटलेल्या साखर-डाळीपासून तयार केलेला प्रसादाचा लाडू खासदार संजय राऊत यांना कुरिअर करून मुंबईच्या घराच्या पत्त्यावर पाठवला आहे. या लाडवांच्या प्रसादाबरोबर जाधव यांनी एक पत्र देखील पाठवले आहे. यात खासदार राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केल्याचे म्हटले आहे.
'या' हेतूने केले साखर-डाळीचे वाटप
धनंजय जाधव म्हणाले की, सुजय विखे पाटील हे मतदार संघात साखर आणि डाळ वाटून मातं मिळवत आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. हे एकदम खोटे आहे. सुजय विखे यांची प्रभू श्रीरामावर आस्था आहे म्हणून त्यांनी अयोध्या राम मंदिर लोकार्पणाच्या (Ayodhya Ram Mandir Inauguration) दिवशी सामान्य नागरिकांना दिवाळी साजरी करता यावी, या हेतूने साखर आणि डाळ वाटली होती. सुजय विखे यांनी असे आवाहन केले होते की, घरोघरी आपण यापासून लाडू तयार करा. आणि त्याचा प्रसाद 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांना दाखवा.
राउतांची शारीरिक, मानसिक स्थिती चांगली राहावी
संजय राऊत यांनी उगीचच राजकीय वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे मला असे वाटते की, त्यांनाही प्रभू श्रीरामांचा प्रसाद संजय राऊत यांच्यापर्यंत गेला पाहिजे. त्यांच्या पत्त्यावर मी त्यांना प्रसाद पाठवत आहे. प्रभू श्रीरामाकडे मी मागणी करत आहे की, संजय राऊत यांची शारीरिक प्रकृती आणि मानसिक स्वास्थ चांगलं राहावे. कुठे राजकारण करावे आणि कुठे करू नये हे त्यांना समजो, अशी प्रार्थना मी प्रभू श्रीराम चरणी करणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
