Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
भिवंडीतील सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.. तसेच पाणी,स्वच्छता, रस्ते,आरोग्याची समस्या कायम आहे.. त्यामुळे आश्वासन देणारा नाही तर काम करणारा नेता हवा असं मत भिवंडीकरांनी व्यक्त केलंय..
भिवंडीत आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असताना उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिकांनी उमेदवारांकडून आपल्या मूलभूत गरजांशी निगडित अनेक महत्त्वाच्या अपेक्षा मांडल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, ट्रॅफिक, रोजगार अशा मूलभूत सुविधांकडे अद्यापही पुरेसे लक्ष न दिल्याचा सार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सर्वच रहिवाशांनी शहरातील घराघरांवर परिणाम करणाऱ्या मूलभूत सुविधांच्या दयनीय स्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून प्रत्येक घरासमोर कचरा कुंड्या असल्या तरी वर्गीकरणाची कोणतीही सोय नाही. दुर्गंधी, माशा, कीटक यांच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेक घरांमध्ये डेंग्यू, मलेरिया, टायफॉईडसारख्या रोगांचा प्रसार वाढत आहे. घरातून बाहेर पडताच खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागतो; अपघातांची संख्या वाढली असून ॲम्बुलन्सलाही घरापासून रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी तासंतास विलंब होतो. पाणीपुरवठ्याची स्थिती इतकी गंभीर आहे की अनेक घरांमध्ये फक्त बोरवेलचेच पाणी उपलब्ध असून ते पिण्यास, स्वयंपाकाला आणि आंघोळीला वापरण्याशिवाय पर्याय नाही; खारटपणामुळे केसगळणे व त्वचेच्या विकारांची समस्या वाढत आहे. शिक्षण क्षेत्रातही घराघरातील पालक चिंतेत असून शाळांच्या खराब इमारती, शिक्षकांची कमतरता आणि तांत्रिक शिक्षणाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे. आरोग्यसेवा, ट्रॅफिक नियंत्रण, रोजगार निर्मिती आणि जबाबदार प्रशासनाचा पूर्ण अभाव नागरिकांना घराघरांत त्रास देत आहे. परिणामी, रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, ट्रॅफिक उपाययोजना आणि रोजगार या घरागणिक भासणाऱ्या मूलभूत गरजा तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची अपेक्षा आहेत.
याशिवाय, शहरातील उद्याने, जॉगिंग ट्रॅक, फिटनेस झोन, पाणीपुरवठा, तात्काळ दुरुस्ती सेवा आणि डिजिटल सुविधा यांचा दर्जा उंचवण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. मुलांसाठी सुरक्षित खेळाची मैदाने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे . निवडणूक जवळ येत असताना उच्चभ्रू सोसायट्यांमधील नागरिकांचे हे स्पष्ट मत आहे की "आम्हाला सुविधा हव्यात, वचनं नव्हे".
महत्त्वाच्या बातम्या























