Satara News: कृष्णा नदीत बुडालेल्या रितेश देशमुखच्या सहकलाकाराचा मृतदेह सापडला, पोहतानाच काळाचा घाला; 'राजा शिवाजी'च्या सेटवर खळबळ
Satara News: 'राजा शिवाजी'च्या सेटवर खळबळ माजली आहे. कृष्णा नदीत बुडालेल्या रितेश देशमुखच्या सहकलाकाराचा मृतदेह अखेर सापडला आहे.

Satara News: सातारा: साताऱ्यातील (Satara) संगम माहुली या ठिकाणी एक कलाकार पाण्यात बुडाल्याची दुर्घटना घडलेली. अभिनेता रितेश देशमुख (Rietesh Deshmukh) याच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात काम करणारा कलाकार कृष्णा नदीत (River) बुडालेला. त्याचा मृतदेह अखेर सापडला आहे. सौरभ शर्मा असं मयत कलाकाराचं नाव आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली.
अभिनेता रितेश देशमुख याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे चित्रीकरण संगम माहुली या ठिकाणी सुरू आहे. या चित्रपटाचं दिवसभरातील शूटिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारा एक कलाकार कृष्णा नदीत (River) बुडाला आहे. सौरभ शर्मा असं या कलाकाराचं नाव असून तो डान्सर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, सौरभ पाण्यात बुडतानाचा व्हिडीओ समोर आलेला. पण त्याला पोहायला येत असल्याची माहिती समोर आली होती.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अभिनेते रितेश देशमुख यांचा राजा शिवछत्रपती या चित्रपटाचं चित्रीकरण आटोपल्यानंतर ही दुर्घटना घडली होती. साताऱ्यातील शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड ट्रेकर्स यांच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू होती.
तब्बल दोन दिवसांनी सापडला मृतदेह
कृष्णा नदीत पोहोण्यासाठी गेलेला कलाकार पाण्याचा अंदाज न आल्यानं डोहात बुडालेला. चित्रकरण करणाऱ्या टीमकडून स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं सौरभचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, अंधार पडल्यानं शोधमोहीमेत अडथळा निर्माण होत होता. अखेर, अंधार पडल्यानं शोध मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर तब्बल 36 तासांनी कलाकाराचा मृतदेह हाती लागला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीनं 'राजा शिवाजी' सिनेमाची घोषणा केली होती. तसेच, या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असल्याचंही जाहीर केलं होतं. 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की, 'इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज... हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही 350 वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे... प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.' सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगाने सुरू असून सर्वांनाच सिनेमाची उत्सुकता आहे. चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार असून या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना त्याने साइन केलं आहे.






















