Riteish Deshmukh : राजा शिवाजी चित्रपटासाठी अभिनेता ते दिग्दर्शक प्रवास कसा घडला? रितेश देशमुख जिनिलियाचं नाव घेत म्हणाला..
Riteish Deshmukh On Raja SHivaji: 100 कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटासाठी गेल्या 10 वर्षांपासून रितेश मेहेनत घेतोय. हा चित्रपट मराठीतच त्याला बनवायचा होता. असंही त्यांनी सांगितलं.

Riteish Deshmukh on Majha Vision:'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटाविषयी सध्या प्रचंड कुतूहल, उत्सुकता दिसून येतेय. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारा अभिनेता रितेश देशमुख आज ABP माझाच्या मंचावर आला होता.'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात त्याने या चित्रपटाविषयी मनमोकळा संवाद साधला. 100 कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटासाठी गेल्या 10 वर्षांपासून रितेश मेहेनत घेतोय. हा चित्रपट मराठीतच त्याला बनवायचा होता. दिग्दर्शक म्हणून उतरण्याआधी रितेशने 2 दिग्दर्शकांशी संपर्क साधला होता. पण, तो प्रयत्न यशस्वी झालं नाही. नंतर जेनेलियाच्या पाठींब्याने त्याने लेखनात आणि दिग्दर्शनात उतरला, असं त्याने सांगितलं. (Riteish Deshmukh)
काय म्हणाला रितेश देशमुख?
'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, "सिनेमासाठी 56 तास झोपलो नाहीय... स्वप्न सत्यात उतरतंय... उद्या 'राजा शिवाजी' सिनेमा भेटीला येतोय... हे स्वप्न माझं एकट्याचं नाही, जे जे लोक या सिनेमाशी जोडलेत, ते स्वप्न त्या सर्वांचं आहे..."
सिनेमा बनवण्यासाठी रितेशचा कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू होता. पण दोनदा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला, त्याबाबत बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, "मला 'राजा शिवाजी' सिनेमा मराठीतच बनवायचा होता. आपली भाषा महाराजांची भाषा असल्यानं हा चित्रपट मराठीतच बनवायचा होता. पहिला प्रयत्न रवी जाधवसोबत 2016 मध्ये केला. छान सुरुवात झाली. पण तो यशस्वी झाला नाही. मग ब्रेक घेतला. 2019 मध्ये नागराज मंजुळे यांचासोबत चर्चा झाली. काहीतरी एकत्र करूया म्हणून आलो, पण कोविड आला, तिथेसुद्धा यश आलं नाही. बऱ्याचदा वाटलं काय करावं. शेवटी वेड चित्रपट रिलीज झाला . पुन्हा काम करायला लागलो या चित्रपटावर त्यावेळी जिनिलिया म्हणाली, तुम्हीच हा चित्रपट लिहा आणि मग बघा काय वाटतंय. नंतर तुम्ही ठरवा दिग्दर्शनासाठी तुम्हाला करता येईल की नाही. माझी दिग्दर्शन करण्याची इच्छा नव्हती. माझ्या क्षमतेपेक्षा फार मोठा चित्रपट आहे. मग मी दोन वर्ष घेतली. पुस्तक वाचली. स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्टवरती काम केले. मग वाटलं की हा चित्रपट आपण दिग्दर्शितही करू शकू. त्यावेळी निर्णय घेतला ." पुढे बोलताना रितेश म्हणाला की, "महाराजांबद्दल श्रद्धा सर्वांना आहे.. मराठी मातीत जन्मलेला महाराजांना देव मानतो... सिद्धिविनायक, विठ्ठल यासारखीच भावना मला महाराजांबद्दल आली..."
'राजा शिवाजी' सिनेमातलं अँथम सॉन्ग कसं सुचलं?
रितेश देशमुखनं कार्यक्रमात बोलताना 'राजा शिवाजी' सिनेमातल्या अंगावर शहारे आणणाऱ्या अँथम सॉन्गबाबतही सांगितलं. रितेश म्हणाला की, "असं गाणं हवं होतं, जे महाराष्ट्राबद्दलाची आस्था एनर्जी दाखवेल, ती भावना शिवजयंती किंवा प्रत्येक कार्यक्रमात असती, तिच भावना पूर्वी लोकांनी राजाबद्दल कशी दाखवली असेल? त्यासाठी अजय-अतुलसोबत चर्चा करून त्यांनी कमाल केली, त्यांनी जबरदस्त गाणं लिहिलं, 1200 लोक होते, लोकल डान्स ग्रुप होते... त्यांच्यासोबत काम केलं, लोकल लोकांनी इच्छा व्यक्त केली होती... सगळ्यांना क्लोजअप हवे होते..."
पुढे बोलताना रितेश देशमुख यानं अजय-अतुल यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत सांगितलं. रितेश म्हणाला की, "अजय अतुल यांच्यासोबत चौथा सिनेमा करतोय... त्यांचं संगीत उत्तमच आहे, त्यांच्यापेक्षा उत्तम कोणी नाही... जितका मोठा मी शिवभक्त, तितकेच अजय अतुल शिवभक्त आहेत... जे माझं स्वप्न होतं, ते म्हणाले आमचंही तेच आहे... संगीत अतिशय सुंदर आहे..."
जेनेलियाविषयी म्हणाला..
कुटुंबाबद्दल बोलताना रितेश म्हणाला की, "राजा शिवाजी' साकारताना जिनिलियाची मोठी साथ लाभली. मी सिनेमा करावा, हे त्यांचच मत आहे... आईचा आशीर्वाद, भाऊ अमित आणि धीरज यांचा सपोर्ट... कसं चाललंय? हे त्यांचं विचारणं... यातूनच ताकद मिळते. आपण स्वतःला जपतो पण नात्याला जपत नाही, पण आपण नाती जपायला हवीत..."





















