Malayalam Actress Miss Kumari Death Mystery: इंडस्ट्रीला पहिला नॅशनल अवॉर्ड मिळवून देणारी 'सुपरस्टार'; 37व्या वर्षी गूढ मृत्यू, पोस्टमार्टेमसाठी मृतदेह कबरीतून बाहेर काढावा लागला
Malayalam Actress Miss Kumari Death Mystery: अचानक सुपरस्टार अभिनेत्रीचा मृत्यू झाला आणि सिनेसृष्टीत खळबळ माजलेली. एवढी की, आजही अभिनेत्रीच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही.

Malayalam Actress Miss Kumari Death Mystery: सिनेसृष्टी (Film Industry) बाहेरुन जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढीच तिची दुसरी बाजू काळ्याकुट्ट अंधारानं व्यापलेली आहे. आज याच काळ्याकुट्ट अंधारलेल्या बाजूचं भयानक सत्य सांगणाऱ्या एका घटनेबद्दल सांगणार आहोत. या घटनेनं इंडस्ट्रीतील फॅन्सना मोठा धक्का बसलेला. ही कहाणी आहे, एका मल्याळम सुपरस्टार अभिनेत्रीची. जिनं मल्याळम सिनेसृष्टीला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आणि ती पहिली महिला सुपरस्टार ठरली. पण, त्यानंतर मात्र, या अभिनेत्रीनं अचानक जगाचा निरोप घेतला. तिचं जाणं फारंच दुर्दैवी होतं, ज्याचं रहस्य आजही उलगडलेलं नाही.
आम्ही ज्या सुपरस्टार अभिनेत्रीबाबत (Superstar Actor) सांगत आहोत, प्रेसिअम्मा कोल्लमपरम्पिल सांगतोय, ज्यांनी 1950 मध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि मिस कुमारी म्हणून ओळख निर्माण केली. 18 वर्षांच्या कारकिर्दीत मिस कुमारीनं 34 चित्रपटांमध्ये काम केलं आणि मल्याळम चित्रपटसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली. पण नंतर, वयाच्या 37 व्या वर्षी, तिनं जगाचा निरोप घेतला. असं म्हटलं जातं की, मिस कुमारी तिच्या शेवटच्या काळात पूर्णपणे एकटी पडलेली. पण, अचानक अभिनेत्रीचा मृत्यू झाला आणि सिनेसृष्टीत खळबळ माजलेली. एवढी की, आजही अभिनेत्रीच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही. त्यावेळी अभिनेत्रीच्या जाण्यानं एवढी खळबळ माजलेली की, तिच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्यासाठी चक्क वर्षभरानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.
1949 मध्ये, कुंचको (Kunchacko) नावाच्या एका निर्मात्यानं मल्याळम चित्रपट उद्योगात प्रवेश केला आणि त्याच वर्षी 'वेलीनाक्षत्रम' हा चित्रपट बनवला. चित्रपटातील एका गाण्यासाठी त्यानं एका नव्या अभिनेत्रीची ओळख सर्वांना करून दिली आणि तिच्या अभिनयानं तो इतका प्रभावित झाला की, त्यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटात तिला मुख्य भूमिकेत घेतलं. त्या अभिनेत्रीचं नाव थ्रेसियार्न्मा कोल्लमपरंपिल होतं, जी नंतर 'मिस कुमारी' म्हणून प्रसिद्ध झाली.
'मिस कुमारी' मल्याळम चित्रपटसृष्टीतील अव्वल महिला सुपरस्टार
पुढच्या वर्षी, 1950 मध्ये, Kunchacko नं मिस कुमारीला मल्याळम चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेत्री म्हणून लाँच केलं. सलग दोन सुपरहिट चित्रपटांसह, मिस कुमारी मल्याळम चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार बनल्या. तिनं 'चेची', 'आत्मासखी' आणि 'कंचना' सारखे हिट सिनेमे दिले.
शाळेत शिक्षिका होत्या 'मिस कुमारी'
मिस कुमारी यांचा जन्म 1932 मध्ये कोट्टायममधील भरणंगणम इथे झाला. प्रेसिअम्मा कोल्लमपरंपिल शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाळेत शिक्षिका बनली. या काळात, कुंचकोनं तिला 'वेलीनाक्षत्रम' चित्रपटात भूमिका देऊ केली. ती लवकरच मल्याळम चित्रपटसृष्टीत सुपरस्टार बनली. या काळात, तिला भास्करन आणि रामू करियत यांच्या 'नीलाकुयिल' चित्रपटानं घवघवीत यश मिळालं. 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं जातीव्यवस्था, सरंजामशाही आणि लैंगिक अन्याय यांसारख्या सामाजिक दुष्कृत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या चित्रपटानं मल्याळम चित्रपटसृष्टीला पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आणि मिस कुमारीच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालेलं.
29 व्या वर्षी लग्न करुन सोडलेली इंडस्ट्री, नंतर बनली तीन मुलांची आई
'मिस कुमारी'नं 29 व्या वर्षी 1961 मध्ये लग्न केलेलं. मिस कुमारीनं Hormis Thaliath नावाच्या एका इंजिनिअरशी लग्न केलेलं. लग्नानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीला अलविदा म्हटलं. ती तीन मुलांची आई झाली, पण नंतर असं काही घडलं की, सर्वांनाच धक्का बसला. 1969 मध्ये, वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी, 'मिस कुमारी' यांचं निधन झालं.
'द हिंदू'नुसार, कोणत्याही वृत्तपत्रानं 'मिस कुमारी' यांच्या मृत्यूबद्दल फारशी माहिती दिली नाही. पोटाच्या आजारानं त्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय. एका वृत्तात असं म्हटलंय की, मृत्युपूर्वीच्या शेवटच्या दिवसांत त्या खूप एकाकी होत्या, मानसिक त्रास, भीती आणि नैराश्यानं ग्रस्त होत्या. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा कोणतीही चौकशी करण्यात आली नाही आणि काय घडलं, हे कोणालाही समजलं नाही.
'द प्रिंट'नं दिलेल्या माहितीनुसार, मिस कुमारी यांचं शवविच्छेदन करणाऱ्या सर्जननं उघड केलंय की, जेव्हा अभिनेत्रीच्या वडिलांनी तिच्या मुलीचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याचा आरोप करत तिच्या अचानक मृत्यूबद्दल तक्रार दाखल केली, तेव्हा त्यांनी चौकशीची मागणी केली. अखेर, तिच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर, दफनभूमीत पुरलेला त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पोटात दुर्गंधीयुक्त कीटकनाशकाचे अंश आढळले. ते अंश विषारी पदार्थ असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, तिचा मृत्यू आत्महत्या, नैसर्गिक किंवा खून होता, हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























