Kapil Sharma: काही देशांचे गॅगस्टरही माझ्या मागे..कपिल शर्माची लॉरेंस बिश्नोईवर सूचक टिप्पणी, कॅफे फायरिंगचा संदर्भ चर्चेत
कपिल शर्माने इशार्यांत गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचा उल्लेख केल्याचं बोललं जात असून, त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Kapil Sharma: कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा 9Kapil Sharma) याच्या एका विधानामुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना कपिल शर्माने “काही देशांतील गँगस्टरही माझ्या मागे लागले आहेत,” असं विधान केलं. मात्र हे बोलताच त्याला परिस्थितीचं भान आलं आणि त्याने लगेचच “हे वाक्य काढून टाका,” असंही म्हटलं. कपिलचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कपिल शर्माने इशार्यांत गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचा उल्लेख केल्याचं बोललं जात असून, त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कपिलच्या कॅनडामधील कॅफेवर फायरिंग करण्यात आली होती.
नेमकं घडलं काय?
हा प्रकार एका मनोरंजन कार्यक्रमादरम्यान घडला. मंचावर सूत्रसंचालक कपिलशी गमतीशीर संवाद साधत असताना, “काही देशांतील पोलिस तुझ्या मागे लागू नयेत,” असा मिश्किल टोमणा मारण्यात आला. यावर उत्तर देताना कपिलने विनोदाच्या सुरात “आता काही देशांतील गुंडही मागे लागले आहेत,” असं वक्तव्य केलं. मात्र कार्यक्रम लाईव्ह असल्याचं लक्षात येताच त्याने शब्द सावरत ते वाक्य काढून टाकण्याची विनंती केली.
मंगळवारी नेटफ्लिक्स इंडियाकडून अनेक नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात कपिल शर्मानेही चाहत्यांना खुशखबर दिली. तो आपल्या संपूर्ण कॉमेडी टीमसोबत मंचावर उपस्थित होता. यावेळी कपिल शर्मा, नवज्योत सिंग सिद्धू, कृष्णा अभिषेक, अर्चना पूरन सिंग आणि कीकू शारदा एकत्र दिसले. कार्यक्रमात कपिल नेहमीप्रमाणे मस्तीच्या मूडमध्ये होता.
View this post on Instagram
‘कॅप्स कॅफे’वर तीन वेळा गोळीबार
कपिलच्या या वक्तव्याचा संबंध त्याला यापूर्वी मिळालेल्या धमक्यांशी जोडला जात आहे. काही काळापूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगकडून कपिल शर्माला धमकी मिळाल्याचं समोर आलं होतं. याच गँगकडून कपिलच्या कॅनडामधील ‘कॅप्स कॅफे’वर तीन वेळा गोळीबार करण्यात आला होता.
कपिल शर्माने 10 जुलै 2025 रोजी कॅनडामध्ये ‘कॅप्स कॅफे’चं उद्घाटन केलं होतं. उद्घाटनानंतर काहीच दिवसांत कॅफेवर पहिला गोळीबार झाला. त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्यांदा हल्ला करण्यात आला. पुढे 16 ऑक्टोबर 2025 रोजी तिसऱ्यांदा कॅफेवर गोळीबार झाला होता. या हल्ल्यांची जबाबदारी गोल्डी ढिल्लो आणि कुलवीर सिद्धू यांनी स्वीकारल्याची माहिती समोर आली होती.






















