Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: 'त्या हरामखोरांकडून' सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण?', मराठी सिनेसृष्टी हळहळली, संतापली; पहलगाम हल्ल्यानंतर नोंदवला निषेध
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack Marathi Actors Reaction: पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर दहशतवाद्यांनी (Terrorists) निष्पाप पर्यटकांवर केलेल्या गोळीबारानं थरारलं. आणि पहलगामची (Pahalgam Terror Attack) भूमी त्या पर्यटकांच्या रक्तानं माखली. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. त्यामध्ये 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून, सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत. अशातच पर्यटकांवरील भ्याड हल्ल्यानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. अशातच बॉलिवूडकरांसोबत मराठी कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करुन हळहळ व्यक्त केली आहेच, पण त्यासोबतच संतापही व्यक्त केला आहे.


मराठी अभिनेता सौरभ गोखलेनं पोस्ट करुन संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, "पूर्ण भिकेला लागला तरी तो देश सुधारणार नाही... घुसून मारा! #Pahalgam TerroristAttack. सर्व धर्माचा आदर करण्याची शिकवण तुमच्या मुलांना जरूर द्या. परंतु, तुमच्या धर्मावर बोट न ठेवून तुमच्यावर अत्याचार होत असेल तर, ते बोट छाटायची हिंमत, ताकद आणि थर्माभिमानही त्याच्यात जागृत करा! ही काळाची गरज आहे."

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरनंही इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन खंत व्यक्त केली आहे. सई म्हणाली की, "काश्मीर येथील बातमी ऐकून धक्का बसला. या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते. अशाप्रकारची हिंसा कधीच जिंकू शकत नाही. #काश्मीर #शांतता"
अभिनेता आरोह वेलणकरनंही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आरोह वेलणकर म्हणाला की, "जम्मू काश्मीर येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यात मुस्लीम नसलेल्या लोकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले... निःशब्द"

अभिनेता वैभव तत्त्ववादीनंही इन्स्टावर स्टोरी पोस्ट करुन निषेध व्यक्त केला आहे. पहलगाम असं लिहून वैभवनं हार्ट ब्रेक आणि रागाचे इमोजी शेअर केले आहेत.

अभिनेत्री तेजश्री प्रधाननंही पोस्ट करुन घटनेचा निषेध नोंदवला आहे. तिनं ट्विटरवर एक कविता पोस्ट केली आहे. "अनेक प्रश्न मनात घिरट्या घालत आहेत… दहशतवाद्यांची जात दरवेळेला एकच कशी असते? हे हल्लेखोर तिथे स्थानिक मदतीशिवाय पोहोचू शकतात का? हिंदू राष्ट्रात, एक हाती हिंदू सरकारात इतर ही नाहीत पण हिंदूच सुरक्षित नाहीत? अश्या घटना घडतात तेव्हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर, इंटेलिजन्स वर विश्वास कसा ठेवायचा? हे आपल्या भारत सरकारचं अपयश नाही? 'त्या हरामखोरांकडून' सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण? इतक्या हल्ल्यांनंतरही "त्यांच्या" घरात घुसून त्यांना का नाही मारत आहोत आपण? निष्पाप लोकांचा जीव गेला, त्यांच्या परिवाराचं सांत्वन कसं करणार आपण? असे अनेक प्रश्न... तुम्हालाही हे भेडसावतात? काळी रात्र , सुन्न मन!"

प्रसिद्ध मराठी अभिनेता सुव्रत जोशीनं या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एक पोस्ट लिहिली आहे. "आज काश्मीरमधून आलेली बातमी ही अत्यंत क्लेशदायक आहे! इस्त्राइलपासून ते काश्मीरपर्यंत जगभरात विविध धर्मातील धर्मांध लोकांनी मांडलेला उच्छाद... सर्व मजहब, Religion आणि धर्म वगैरे एकत्र बुडवून एकदाचा संपवावा... कारण, एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्याची ही तृष्णा कधीही न संपणारी आहे. त्यात स्वतःला त्या धर्मातील मानणाऱ्या सूज्ञ वगैरे म्हणवणाऱ्या लोकांची अलिप्तता किंवा मूक पाठिंबा हा अधिक घातक आहे. अरुण कोल्हटकरांच्या 'शेवटचा अश्रू' या कवितेचीच आठवण होत आहे." असं सांगत सुव्रतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्राजक्ता माळीनंहीपहलगाम हल्ल्यावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिनं आपल्या इन्स्टा स्टोरीवर श्री श्री रविशंकर यांचा एक कोट शेअर केला आहे. त्यासोबत #Pahalgam असंही लिहिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























