वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार सभादरम्यान जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य करत भूमिका मांडली.

जळगाव : राज्यात महापालिका निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राजकीय वातावरण तापलं असून महायुतीमधील नेतेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं भाजपला आव्हान आहे. त्यामुळे, अजित पवारांकडून (Ajit pawar) भाजपवर हल्लाबोल केला जात आहे. तर, भाजपकडूनही अजित पवारांवर पलटवार केला जात आहे. मात्र, अजित पवारांनी टीका करताना विचार करावा, अशी भूमिकाही काही भाजप नेत्यांनी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यातच, भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्दयावरुन अजित पवारांना घेरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षालासुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, असं मंत्री आणि भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही तीच भूमिका मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कालही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा होता, आजही आहे आणि उद्याही त्याच विचारांवर चालणारा पक्ष असेल, असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यानंतर, राजकीय वर्तुळातून भाजपकडून टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार सभादरम्यान जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य करत भूमिका मांडली. त्यामध्ये, अजित पवारांनाही मित्रत्वाचा सल्ला दिलाय. मला अस वाटत की, अजित पवार यांनी वीर सावरकरांचे विचार विरोध करण्याचे कारण नाही. त्यांनी तसं केल्याचं मला माहिती नाही, त्यांनी तसं केलं असेल का? आमची भूमिका पक्की, वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
घराणेशाहीवर स्पष्टीकरण
निवडणुकीसंदर्भाने राज्यात भाजपने एक पॉलिसी ठरवली आहे, त्यात एक दोन ठिकाणी अपवाद झाले. वेळेवर अल्ट्रनेट उमेदवार आणता आला नाही, दुसरीकडे आम्ही तसं काही केलेले नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी घराणेशाहीवरुन होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं.
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. ''रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, स्पष्टीकरणही दिले आहे. विलासराव यांच्याबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर आहे, त्यांच्या स्मृती पुसल्या जाणार नाहीत. कुणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही, त्यांनी केली आहे.'', असे फडणवीसांनी म्हटले.
आशिष शेलारांचा अजित पवारांना इशारा
आम्ही स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे भक्त आहोत. आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालणारे आहोत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षालासुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, असं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं. तसेच तु्म्ही याल तर तुमच्याबरोबर आणि नाही आलात तर तुमच्याविना... विरोधात शिरला तर विरोधात.. आम्ही आमचं काम करत राहू, असा इशाराच आशिष शेलार यांनी अजित पवारांना दिला. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी




















