Mandana Karimi: भारतात स्टार बनली, इथेच उरकलं लग्न, आता म्हणतेय, 'सुरक्षित वाटत नाही, इराणला जायचंय'; कोण आहे बॉलिवूडची अभिनेत्री मंदाना करिमी?
या अभिनेत्रीला आता भारत सोडायचाय, इथे तिला सुरक्षित वाटत नाही, त्यामुळे तिला इराणला जायचं आहे असं तिने म्हंटल. ईराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तिच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चाय.

Mandana Karimi: जगभरात सध्या युद्धाचे वारे वाहत आहेत. इराण इस्रायल युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये ताण वाढला आहे. आखाती देशांमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. अनेकजण मदतीसाठी आवाहन करत आहेत. दरम्यान 37 वर्षांची इराणी अभिनेत्री सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारतात येऊन तिने नाव, प्रसिद्धी आणि करिअर कमावलं, इथेच लग्न उरकलं; मात्र आता भारत सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे. या अभिनेत्रीला आता भारत सोडायचाय, इथे तिला सुरक्षित वाटत नाही, त्यामुळे तिला इराणला जायचं आहे असं तिने म्हंटल. ईराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तिच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
“मी भारताशी ब्रेकअप करत आहे...”
एका मुलाखतीत मंदानाने सांगितलं की, "हे सरकार जायला हवं. मला इराणसाठी जे भविष्य दिसतं, ते म्हणजे एक मुक्त इराण. असा इराण जिथे महिलांना हवं ते करण्याचं स्वातंत्र्य असेल. हवं ते कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असेल. हवी ती विद्यापीठं निवडून शिक्षण घेता येईल. मला असा इराण पाहायचा आहे ज्याचे मध्यपूर्व देशांशी उत्तम संबंध असतील. आपण कोणासाठीही धोका नाही, तर मध्यपूर्व उभारण्यात मोठा वाटा उचललेलं राष्ट्र आहोत. मला इराणसाठी जे हवं आहे ते म्हणजे या सत्तेचा अंत."
ज्या क्षणी हे सरकार जाईल, त्या क्षणी मी इराणला जाईन. माझ्या बॅगा आधीच भरलेल्या आहेत. मी कधीही निघायला तयार आहे. मला असं वाटतंय जणू मी भारताशी नातं तोडते आहे. हे माझ्यासाठी खूप कठीण आहे. कारण मी खूप लहान वयात भारतात आले. भारताने मला सगळं काही दिलं. माझं मॉडेलिंग करिअर, अभिनय करिअर आणि भरपूर प्रेम. माझे मित्र इथे आहेत. पण मला असं वाटतं की भारतात मला आवाज नाही."
गेल्या दोन महिन्यांत, मुंबईत राहूनही मला इतकी घरची ओढ कधीच जाणवली नव्हती. इथे माझे बरेच मित्र आहेत. पण दुर्दैवाने, मी इराणबाबत उघडपणे बोलले, आंदोलनात सहभागी झाले, आणि त्यामुळे काही तथाकथित मित्र गमावले. मला एका अर्थाने असं वाटतं की भारताने माझा विश्वासघात केला. भारताने जे द्यायचं होतं ते दिलं, पण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. आशा आहे की लवकरच मी इराणला परत जाईन. तिच्या या विधानानंतर चाहत्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं.
View this post on Instagram
"या कठीण काळात तिला मित्रांकडून, सरकारकडून किंवा माध्यमांकडून पाठिंबा मिळाला नाही... यामुळे, भारत आता तिला आपलं घर वाटत नाही. तिनं असंही म्हटलंय की, परिस्थिती कठीण आहे, पण ती इराण आणि तेथील लोकांसाठी पुन्हा ते सर्व सहन करण्यास तयार आहे..." सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, तिनं स्पष्ट केलं की, ती देशाबाहेर गेल्याशिवाय अधिक माहिती देऊ शकत नाही. मंदाना बऱ्याच काळापासून इराणमधली परिस्थिती आणि तिथल्या मुद्द्यांवर बोलतेय. ती म्हणते की, तिच्या सततच्या सक्रियतेमुळे आणि राजकीय वक्तृत्वामुळे तिला एकटं आणि असुरक्षित वाटू लागलं आहे. परिणामी, तिला आता भारतात राहणं तिच्यासाठी असुरक्षित वाटतंय, त्यामुळेच तिनं इराणला परतण्याचा निर्णय घेतलाय.
कोण आहे मंदाना करीमी?
19 मे 1988 रोजी तेहरान (ईराण) येथे जन्मलेल्या मंदानाचे वडील रेजा करीमी भारतीय तर आई सबा करीमी इराणी वंशाच्या आहेत. त्यामुळे ती अर्धी भारतीय आणि अर्धी इराणी आहे. सुरुवातीला तिने एअर होस्टेस म्हणून काम केलं, पण नंतर मॉडेलिंगसाठी करिअरची दिशा बदलली. 2010 साली ती मुंबईत आली आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम सुरू केलं.
2015 मध्ये Roy या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये कॅमिओ भूमिका साकारली. त्याच वर्षी ती Bigg Boss 9 मध्ये झळकली आणि सेकंड रनर-अप ठरली. या शोमुळे ती घराघरात पोहोचली. पुढे भाग जॉनी , क्या कुल है हम 3 आणि में और चार्ल्स यांसारख्या चित्रपटांत तिने काम केलं. 2017 मध्ये तिने गौरव गुप्ताशी विवाह केला होता; मात्र काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. आता भारत सोडण्याच्या तिच्या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
























