Nashik Crime News : येथे लघुशंका करू नकोस..., किरकोळ कारणावरून वाद, मजुराला छाती अन् पोटावर वार करत संपवलं; नाशिकमध्ये आठवड्याभरात खुनाची तिसरी घटना
Nashik Crime News: नाशिक शहरात अवघ्या आठवड्याभरात तीन खून झाल्यामुळे गुन्हेगारीचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nashik Crime News: वडाळा नाका (Wadala Naka) परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) उड्डाण पुलाजवळ केवळ लघुशंका करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका 35 वर्षीय मजुराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंडू लक्ष्मण गांगुर्डे असे मयत मजुराचे नाव असून, तो आपल्या पत्नीसोबत पुलाखाली वास्तव्यास होता.
ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. आरोपी जयेश दीपक रायबहादुर याने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यास बंडूने आक्षेप घेतला. “येथे लघुशंका करू नकोस,” असे म्हणताच, संतप्त झालेल्या जयेशने जवळच्या धारदार चाकूने बंडूवर हल्ला चढवला. छाती व पोटावर वार करत त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर जयेश घटनास्थळावरून फरार झाला.
मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू (Nashik Crime News)
जखमी बंडूला त्याची पत्नी अक्की गांगुर्डे व नातेवाइकांनी तातडीने रिक्षामार्फत जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर अक्की गांगुर्डे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
आरोपीचा शोध सुरु (Nashik Crime News)
पोलिसांनी जयेश रायबहादुर याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून शोध सुरु केला आहे. विशेष म्हणजे, जयेशवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत सहा गंभीर गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुलाखाली राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस निरीक्षक अतुल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
नाशिकमध्ये आठवड्याभरात तीन खून (Nashik Crime News)
नाशिक शहरात अवघ्या आठवड्याभरात तीन खून झाल्यामुळे गुन्हेगारीचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिक नगर येथे किरकोळ वादातून 23 वर्षीय कंपनी कामगाराचा 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून कुरापत काढून एका युवकाचा खून करण्यात आला होता. या दोन्ही घटनांच्या पाठोपाठ आता मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अतिशय किरकोळ कारणावरून एका मजुराचा खून झाल्याने पोलीस दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनांमुळे नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत गुन्हेगारी झपाट्याने वाढत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालावा, अशी मागणी नाशिककरांकडून करण्यात येत आहे.
आणखी वाचा























