मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
तक्रारदाराने दिलेल्या माहिनुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून पहिल्या हप्त्यात 40 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.

मुंबई : राज्यातील लाच लुचपतप्रतिबंधक (ACB) विभागाने कारवाईचा धडकाच लावला असून आता मुंबईत (Mumbai) अंधेरीत BMC जलविभागातील अधिकाऱ्याला 40 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात अटक केली आहे. अंधेरी पश्चिम येथील के/पश्चिम विभागातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागातील जलमापक पर्यवेक्षक विनोद भगवान राठोड याला 40 हजार रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. तक्रारदाराने दुकानासाठी पाण्याचे मीटर आणि पुन्हा नळ जोडणीसाठी अर्ज केला होता. या कामासाठी सुरुवातीला 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी संबंधित अधिकाऱ्याने केली होती. अखेर तडजोडीनंतर 80 हजार रुपयांवर व्यवहार ठरला.
तक्रारदाराने दिलेल्या माहिनुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून पहिल्या हप्त्यात 40 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. तर, उर्वरीत 40 हजारांची रक्कम दुसऱ्या हफ्त्यात मागण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, संबंधित दुकानदाराने थेट एसीबी विभागाकडे धाव घेत तक्रारी केली. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर पडताळणीत जलमापक निरीक्षक नंदन बाळकृष्ण मोरे (पाहिजे आरोपी) यांनी लाचेची रक्कम राठोड यांना देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीने, अंधेरीतील एस. व्ही. रोडवरील कासम अली शकूर चौकाजवळील टॉप 10 मोबाईल शॉपसमोर सापळा रचून राठोड याला लाच घेताना अटक केली. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नळ जोडणी आणि पाण्याचे मीटर हा नागरिक, व्यवसायिकाचा हक्क असून नियमानुसार रक्कम भरल्यानंतर महापालिकेकडून त्यांना नळ जोडणी देणे बंधनकारक आहे. मात्र, तरीही अशा कामांसाठी तब्बल लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहेत. तसेच, लोकप्रतिनिधींनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची मागणी केली जात आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबीने कारवाईचा धडाका लावल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, शिपायापासून ते जिल्हाधिकारी पदापर्यंतच्या अनेकांन थेट बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही राजरोसपणे लाचेची मागणी केली जात असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला






















