देशाच्या संपत्तीपैकी एक तृतीयांश संपत्ती शेअर मार्केटमधून, 8.5 कोटी गुंतवणूकदारांपैकी 2 कोटी महिला
देशातील एक तृतीयांश संपत्ती सध्या शेअर बाजारातून (Share Market) निर्माण होत आहे. देशाला पुढे नेण्यात शेअर बाजार खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
Share Market: देशातील एक तृतीयांश संपत्ती सध्या शेअर बाजारातून (Share Market) निर्माण होत आहे. देशाला पुढे नेण्यात शेअर बाजार खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या देशात सुमारे 8.5 कोटी गुंतवणूकदार आहेत. त्यापैकी 2 कोटींहून अधिक महिला आहेत. तसेच 5 कोटींहून अधिक कुटुंबे शेअर बाजारातून थेट गुंतवणूक करतात. एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे की भारतातील शेअर बाजारांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास सतत मजबूत होत आहे.
भारताची अर्थव्यवस्था 100 ट्रिलियन डॉलर्स होणार
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे MD आणि CEO आशिष कुमार चौहान म्हणाले की, भारतातील प्रत्येक तीन संपत्तीपैकी एक शेअर बाजारातून येत आहे. भारताची अर्थव्यवस्था 50 वर्षांत 100 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते असे चौहान म्हणाले.
NSE चे मार्केट कॅप 4.34 ट्रिलियन डॉलर
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भारत 4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल असा अंदाज अनेक अधिकारी आणि मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मार्केट कॅप 2023 च्या अखेरीस 4.34 ट्रिलियन डॉलर आहे. UBS च्या अहवालानुसार 2022 मध्ये भारताची संपत्ती 15.4 ट्रिलियन डॉलर होती.
लोकसंख्या ही आपली मोठी ताकद
बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटी (BACS) च्या कार्यक्रमात बोलताना चौहान म्हणाले की, जग जर 250 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक संपत्ती निर्माण करणार असेल तर त्यातील सुमारे 30 टक्के भारताची असेल. आपण जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 18 टक्के आणि तरुण लोकसंख्येच्या 20 ते 22 टक्के आहोत.
शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी प्रचंड संपत्ती निर्माण करत आहे
भारतातील भांडवली बाजार गुंतवणूकदारांसाठी प्रचंड संपत्ती निर्माण करत आहेत. शेअर बाजारावरील लोकांचा विश्वास दृढ झाला आहे. त्यामुळेच देशातील गुंतवणूकदारांची संख्या साडेआठ कोटींवर पोहोचली आहे. याशिवाय 2 कोटींहून अधिक महिलाही आपले भांडवल शेअर बाजारात गुंतवत आहेत. देशातील 5 कोटींहून अधिक कुटुंबे शेअर बाजारातून गुंतवणूक करत आहेत. हा आकडा भारतातील एकूण कुटुंबांपैकी 17 टक्के असल्याचे चौहान म्हणाले.
शेअर बाजाराने लोकांची जीवनशैली बदलली
गेल्या 10 वर्षांत शेअर बाजाराने लोकांची जीवनशैली बदलण्यास मदत केली आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत, NSE चा गुंतवणूकदार 7 कोटींवरून 8 कोटींपर्यंत वाढला होता. वर्षअखेरीस हा आकडा 8.5 कोटी गुंतवणूकदारांवर पोहोचला. हे गुंतवणूकदार भारतातील 99.8 टक्के भागातून येतात. सुमारे 90 लाख गुंतवणूकदारांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या कॅलेंडर वर्षात इक्विटी डेरिव्हेटिव्हमध्ये किमान एकदा व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वार्षिक आधारावर 31 टक्क्यांनी वाढून 83.6 लाख झाली आहे. रोख विभागासाठी, ही संख्या वार्षिक आधारावर 0.4 टक्क्यांनी घसरून 2.67 कोटी झाली आहे.