एक्स्प्लोर

रेड लाईट डायरीज : गिरिजाबाई .....

गिरिजाला तिच्या मावशीने सरोजने इथे आणलेलं. सरोज अगदी गोड गळ्याची बाई होती. दिसायला बऱ्यापैकी आणि अस्सल लखनवी बाजाचं राहणीमान असणारी. साध्या कपड्यात देखील ती उठून दिसायची. अडल्या नडल्यास मदत करायचा सरोजचा स्वभाव होता.

पूर्वी कामाठीपुऱ्यात एक मुजरा गल्ली होती. इथं गाणं बजावणं चालायचं. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ही गल्ली होती. लखनौ, मुरादाबादपासून लाहोरपर्यंतचे अनेक शायर इथं रातोरात हजेरी लावून जायचे. अनेक नामचीन शायर त्यात सामील होते. इतिहासाने कधी दखल न घेतलेले काही प्रतिभावंत फणकारदेखील इथं यायचे. या सर्व लोकांनी मद्य आणि मदिराक्षीचा मनसोक्त आनंद घेत आपल्या सुखदुःखाच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपलं काळीज तिथं ते कागदावर उतरवत गेले. या गल्लीतील जवळपास प्रत्येक मुजरेवालीकडं शायरांनी त्या धुंद नशेत लिहिलेलं अलौकिक बाड होतं. त्याला काही बायका दफ्तर म्हणत तर काहीजणी कलम म्हणत तर काही चक्क दर्दमौसिकी म्हणत. आता ती गल्लीही नाही आणि त्या बायकाही नाहीत. यातलीच एक सत्तरीतली बाई आताच्या कामाठीपुऱ्यात मला भेटली होती, तेंव्हा ती फाटक्या कळकटलेल्या चादरीवर बसून जर्मनच्या वाडग्यात भीक मागत होती. पार मळकटलेल्या अवस्थेत होती ती. मात्र तिचा गळा अजूनही शाबूत होता आणि पायातही थोडीफार जादू बाकी होती. गिरिजा तिचं नाव. त्या गिरिजाबाईची ही चित्रकथा... कामाठीपुऱ्याच्या या मुजरा गल्लीत अरुंद बोळ आणि खेटून उभ्या असलेल्या कळकटलेल्या इमारतींच्या भाऊगर्दीत अजूनही उभी आहे 'आशियाना' ही आता पडायला झालेली इमारत. या इमारतीच्या आठवणी हिराबाईशी अन तिच्या मुलीशी ताजेश्वरीशी निगडीत आहेत. त्यांच्यासोबत इथेच गिरिजाबाईही राहायची. आजही 'आशियाना' गिरिजा आणि हिराबाईच्या मधुर आवाजाला आसुसलेला असेल असं वाटते. 'बच्चुची वाडी' पासून उजव्या हाताला वळून पुढे आले की गल्लीतली सर्वात जुनी इमारत म्हणजे 'आशियाना'. जागोजागी भितींच्या गिलाव्याचे पोपडे निघालेले, आतल्या विटांचे लाल काळे आतडे बाहेर डोकावणारे अवशेष पहिल्या नजरेत तिरस्करणीय वाटतात. इथल्या लाकडी खिडक्यांनी केंव्हाच माना टाकलेल्या तर दरवाजांची फळकुटे नावाला आहेत, इमारतीच्या दर्शनी भागातल्या खोल्यांचे सज्जे पार वाकून गेलेले अन त्यांचे कठडे कलून गेलेले, त्या कठड्यावर आतल्या बायकापोरींनी नाही नाही ते सर्व धुवून वाळत घातलेले. अगदी बेडशीटपासून ते ब्लाऊजपर्यंत सगळं तिथं बाहेर लटकत राहते. 'आशियाना' एक चौकोनी इमारत आहे, चार विंगा असाव्यात तशी हिची रचना. मधोमध मोकळी जागा जणू काही मेघांनीही तिथं आत वाकून बघावं अन आपल्या इच्छावासना शमवून घ्याव्यात अशी तिची बांधणी . दिवसभरात उन्हे या चारही भागातून मनसोक्त फिरतात, इमारतीच्या दाटीवाटीमुळे वारा मात्र इथं फारसा नाही. इमारतीच्या दर्शनी भागातील तळमजल्यावर दुकानांची रांग अन त्यांच्या मधोमध दरवाजा नसलेली एक भली मोठी लाकडी चौकट आहे. कधीकाळी इथे दरवाजा असणार, कारण कडी अडकवण्याच्या खाणाखुणा तिथं खाली जमिनीत अन वर छतात दिसतात. खाली सगळीकडे शहाबादी फरशा अंथरलेल्या मात्र प्रत्येक फरशीचे तुकडे उडालेले अन त्या तुकड्यातून डोकावणारी मातकट जमीन यावरून माणसे येजा करत राहतात, लोक खाली बघत आत येत नाहीत तर त्यांच्या नजरा इतस्ततः खिळलेल्या असतात त्यामुळे ते खाली गटारगंगा वाहत असली तरी त्यातून खुशाल पुढे चालतच राहतात. इतरत्र आढळतात तसे जागोजागी पान खाऊन थुंकलेले जिने, रंग उडालेला बाह्य भाग अन दाटीवाटीने लावलेली वाहने, पाण्याचे गळके फुटके नळ, मोऱ्यात पडलेली शाम्पूची, गुटख्याची अन नको त्या गोष्टींची वेष्टने अशा कबाडखानी अंगणाच्या या इमारतीची खासियत तिथल्या उजव्या दिशेतील चाळवजा भागात होती. अख्ख्या कामाठीपुरयात आता फक्त बच्चूच्या वाडीत नाचगाणं चालतं. पूर्वी या मुजरा गल्लीत आशियान्याच्या चार पैकी या भागातील इमारतीसह अन्य काही घरातही नाचगाणे चालत असे, ते पण असे असायचे की तिथे अंगाला हात लावून घेतला जात नसे. गिरिजाला तिच्या मावशीने सरोजने इथे आणलेलं. सरोज अगदी गोड गळ्याची बाई होती. दिसायला बऱ्यापैकी आणि अस्सल लखनवी बाजाचं राहणीमान असणारी. साध्या कपड्यात देखील ती उठून दिसायची. अडल्या नडल्यास मदत करायचा सरोजचा स्वभाव होता. सदानकदा खाण्याची भ्रांत असणाऱ्या आपल्या धाकट्या बहिणीचं कमलाचं तिला फार शल्य वाटे. तिने ठरवले की आपल्या बहिणीला दैन्यावस्थेतून बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी हातपाय मारले पाहिजेत. मनाचा हिय्या करून तिनं कमलाला सांगितलं की, तू एखाद्या मुलीला माझ्यासोबत दे, तुला खूप आधार होईल. इथं पैसा बऱ्यापैकी मिळतो त्यावर तुझं अख्खं घर निभावून जाईल. कमलाबाईला आठ मुली आणि दोन मुलं होती. खाण्यापिण्याची आबाळ आणि घरात अठराविश्वे दारिद्र्य असे. नवरा मोल मजुरी करायचा. रोज उठून दारू प्यायचा, तिच्यावर हात उचलायचा. जास्ती पिऊन आला की मुलाबाळांना देखील हाणायचा. गिरीजा तिची थोरली मुलगी होती.  पोरीबाळी मोठ्या व्हायला लागल्या होत्या. त्यांचं अंग भरून येऊ लागलं होतं. काहींना शाळेत घातलं होतं तर काहींना संगे घेऊन ती थोरामोठ्यांच्या घरी कामावर जाई. हेतू हा की, तिथलं काही उरलं सुरलं शिळे पाके खायला मिळेल आणि त्यांचा उपवास टळेल. पण असं किती दिवस चालणार याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. काही तरी मार्ग काढणे आवश्यक होते. शेवटी तिने काळजावर दगड ठेवला आणि चौदा वर्षाच्या गिरिजाला आपल्या बहिणीच्या हवाली केलं. गिरिजा गेली त्या रात्रीपासून तिचं मन तिला खात राहिलं, अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ती स्वतःला माफ करू शकली नाही. तारुण्यात पाऊल टाकणाऱ्या गिरिजाला मावशीच्या नटण्यामुरडण्याचं अप्रूप होतं. आपल्याला आता मावशीच्या गावाला जाता येणार याचा तिला आनंदही झाला होता आणि मायबापापासून, भावंडांपासून दूर जावं लागणार याचं दुःखही झालं होतं. आपल्याला मावशीकडे गेल्यावर तिच्यासारखे जरतारी कपडे मिळणार, सुगंधी अत्तर अंगावर शिंपडता येणार, सजता सवरता येणार या कल्पनेच्या मोरपीसाने तिच्या विरहवेदना हलक्या होत. एका पावसाळ्यात सरोजने गिरिजाला आपल्या कोठ्यावर आणलं. इथलं वातावरण बघून गिरिजाला आधी भारी वाटलं. मावशी गाते, बायकापोरी नाचतात, समोरचे लोक पैसे उधळतात हे सगळं तिला स्वप्नवत वाटले. सरोजने गिरिजासाठी नाचगाणं शिकवणाऱ्या उस्तादची सोय केली. गिरिजा दिसायला जशी कमालीची आकर्षक होती तसंच तिचं गायनही होतं. अगदी सुरेल आवाजात ती गायची. ऐकणारा तल्लीन व्हावा अशी जादू त्यात होती. तारुण्याने मुसमुसलेल्या तिच्या पायात जादू होती. विजेच्या चपळाईने ते थिरकत. तिचं दिसणं, गाणं आणि नाचणं सारंच अप्रतिम होतं. बघता बघता सहा महिन्यात तिची तालीम संपली आणि तिची पहिली मैफल घ्यायचं पक्कं झालं. तिच्यासाठी साडीवाल्याला बोलावणं धाडलं गेलं. नामी कंपनीच्या साड्या, रेशमी तलम कपडे बघून गिरिजाचा जीव हरखून गेला. त्यातल्याच तब्बल अर्धा डझन साड्या तिच्याकरिता खरेदी केल्या गेल्या. तिच्या मापाचे सलवार कमीज शिवण्यात आले. गिलीटाचे सोन्याचे मुलामा दिलेले दागिने घेतले गेले. पहिल्या मैफलीत तिला अप्सरेसारखं सजवलं गेलं. तिची नजर उतरवून मग पायात घुंगरू बांधले गेले. तिने मैफल अशी गाजवली की अल्पावधीतच तिचं नाव कर्णोपकर्णी झालं. तिला भक्कम पैसा मिळू लागला. गिरिजाला मिळणाऱ्या बिदागीचे पैसे सरोज इमानेइतबारे कमलाच्या घरी पोहोच करायची. बघता बघता एक वर्ष उलटून गेलं. गिरिजाला आता घरची आठवण येत होती. तिनं सरोजकडे हट्ट धरला आणि काही दिवसाच्या सुट्टीवर घराकडे जायचं नक्की केलं. भावंडांना कपडे लत्ते घ्यावेत, लंकेची पार्वती असणाऱ्या आईला एखादा दागिना घ्यावा यासाठी तिने टुमणे लावले. गिरिजाला बाहेर नेणं सरोजला टाळायचे होते पण टाळणार तरी किती दिवस ! शेवटी एका सोमवारी दुपारी त्या बाहेर पडल्या. कामाठीपुरयात आल्यापासून गिरिजा पहिल्यांदाच बाहेर पडली होती. ती बंदिस्त नव्हती पण तिने बाहेरचे 'ते' जग इतक्यात पाहू नये अशी सरोजची इच्छा होती. कोंबडी झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा थोडीच राहणार होता ! सरोजमौसीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर गिरिजाने अजस्त्र कामाठीपुरयाचं जे बीभत्स, गलिच्छ, ओंगळवाणे स्वरूप पाहिले त्याने तिला गुदमरायला झालं.  तिची विस्फारलेली नजर पाहून सरोजने तिला जवळ घेतले, आपल्या अश्रूंना वाट करून दिली. इथं वासनेचा बाजार कसा भरतो, मुली कशा आणल्या जातात आणि त्यांचा शेवट काय होतो ही सर्व कर्मकहाणी तिला थोडक्यात सांगितली. तेव्हढ्यानेच तिला भोवळ यायची वेळ आली होती. संध्याकाळ होईपर्यंत त्या दोघी खरेदी करून परत आल्या. सरोजच्या घरातून निघताना जो आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता तो आता साफ मावळला होता. दोनेक दिवसांनी त्या बनारसला रवाना झाल्या आणि तिथून सरोजने आधी गिरिजाला तिच्या घरी सोडलं. एक रात्र मुक्काम करून ती पुढे आपल्या घरी रवाना झाली. आपल्या मुलीचं देखणं रूपडं पाहून तिच्यात झालेला कायापालट अनुभवून ती माय माऊली हरखून गेली होती. तिच्या भावंडांना देखील खूप आनंद झाला होता. माहेरी आलेल्या पोरीचे लाड करावेत तसं कमला करत होती. तिला न्हाऊ माखू घालण्यापासून ते रात्री ती झोपी गेल्यानंतर गुपचूप तिचे पाय चेपून देण्यापर्यंत सगळं करे. आपली मुलगी एकटी असली की उदास असते हे तिने ताडले होते. तिने खूप खोदून खोदून विचारले पण गिरिजानं काही केल्या तोंड उघडलं नाही. मुंबईत परतायचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतशी तिची अस्वस्थता वाढत गेली. अन्न गोड लागेनासे झाले, डोळ्यावरची झोप उडून गेली. तिचं मन तिला खाऊ लागलं. खरं तर तिला परत जाऊ वाटत नव्हतं, पण आपण गेलो नाही तर आपल्यामागे इथं सगळ्यांची उपासमार ठरलेली आहे हे तिला उमगले होते. तिची तगमग आईच्या काळजाने हेरली. एका रात्री कमलाने तिला शपथ घातली तेंव्हा गिरिजाने तिला जोराची मिठी मारली. तरी देखील मनातलं सगळं मळभ ती रितं करू शकली नाही. आपल्या दुःखाने आपल्या आईचं जगणं हराम होऊन जाईल हे तिला माहिती होतं. त्यामुळे काळजाचा सल तसाच टोचता ठेवून ती परत आली. येताना भावंडांच्या गळ्यात पडून रडली. आपली बहिण इतकी का रडत्येय हे त्या लहानग्यांना समजण्या पलीकडचे होते. गिरिजाच्या हळव्या निरोपामुळे कमलाच्या गावातले लोक देखील बुचकळ्यात पडले होते. नाही म्हणायला सरोजच्या बदनामीचे काही शिंतोडे आता गिरिजाच्या वाट्याला यायला सुरुवात झाली होती. या खेपेला मुंबईत कामाठीपुऱ्यात आल्यानंतर तिनं काळजावर धोंडा ठेवला आणि इथला सगळा व्यवहार हळूहळू समजून घेण्याकडे तिने कल ठेवला. बघता बघता वर्षे गेली. तिचं घराकडे जाणं कमी झालं. तिच्या बहिणींची लग्ने होऊन गेली. भावंडांना चरितार्थाचा आधार झाला होता. थकून गेलेली आई तिला परत बोलवत होती पण आपल्यामुळे गावात आईची बदनामी व्हावी हे तिला पटत नव्हते. एका वर्षी तिचा बाप मेल्याचे पत्र आले, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहिले नाहीत पण आईसाठी फार वाईट वाटलं. सर्वात धाकट्या भावाच्या लग्नाला मात्र ती गावाकडे जाऊन आली तेंव्हा आईला डोळे भरून पाहणे हेच तिचे खरे उद्दिष्ट होते. त्या नंतर ती पुन्हा मुंबईत आली. एका पावसाळी आई गेल्याचं पत्र आलं. त्या दिवशी मात्र ती खचून गेली. पण गावाकडे गेली नाही, कारण तिथं तिची अंतःकरणापासून वाट बघणारं कुणी उरलं नव्हतं. त्या रात्री तिला झोप कसली म्हणून आली नाही. नंतरही कितीतरी दिवस तिला आईचे भास होत होते. तिच्या जगण्यातला जणू रस हरवला होता. बघता बघता काळ पुढे सरकत गेला. तिची उमर ढळत गेली. गल्लीतलं गाणं बजावणं कमी होत गेलं. तिच्यामागून आलेल्या लोकांची उपासमार होऊ लागली तर तिचा काय पाड लागावा ! तिचे हलाखीचे दिवस सुरु झाले. अशीच काही वर्षे निघूनगेली .... हिराबाईच्या केसची माहिती घेण्यासाठी तिथं गेल्यावर गल्लीच्या कोपरयावर चहाच्या टपरीपाशी फाटक्या कळकटलेल्या चादरीवर बसून जर्मनच्या वाडग्यात भीक मागणारी जर्जर अवस्थेकडे झुकलेली वृद्धा दिसली होती. डोक्यावरच्या केसांची चांदी झालेली. समोरचे काही दात पडलेले. एके काळचे लालबुंद पाकोळीसारखे नाजूक ओठ सुकून गेले होते, त्यांना चिरा पडल्या होत्या. कधी काळी देखण्या सौंदर्याची चकाकती झळाळी असणारा चेहरा आता धुळीने भरलेला होता. खोल गेलेल्या डोळ्याखाली  काळी वर्तुळे जमा झाली होती. कानाच्या मुलायम पाळ्या रित्या लोंबत होत्या. गाल ओघळून गेले होते. कपाळावर सुरकुत्यांच्या रेषांचा आकृतीबंद साकारला होता. भांगेत कुमकुम लावून लाल झालेली रेष फिकट झाली होती. गळ्यात कसल्याशा काळ्या मण्यांची माळ होती. हातात कचकडयाच्या बांगड्या होत्या. मान थरथरत होती. तरीही तिच्यात एक चुंबकीय आकर्षण होतं जे मला इतकं तीव्रतेने जाणवलं की तिच्याकडे खेचला गेलो. शेजारच्या हॉटेलमधून तिला खायला आणून दिलं. तिने आधी माझ्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं. तिला काय वाटले कोणास ठाऊक. पण पुढच्याच क्षणाला अक्षरशः अधाशासारखी ती तुटून पडली. तिची भूक पाहून तिला पुड्यात आणखी खायला आणलं त्यावर पुन्हा एकदा तिने मला निरखलं. आताचा पुडा तिने मांडीखाली दडवून ठेवला. पोटभर पाणी पिऊन झाल्यावर मी खिशाकडे हात नेताच तिने हात जोडले. "नही नही' असं म्हणत ती केविलवाण्या नजरेने पाहू लागली. तशा अवस्थेतील तिचे ते दोनच शब्द कानाला विलक्षण गोड वाटून गेले. तिचा अंदाज घेण्यासाठी म्हणून सहजच फासा फेकून बघितला. "मुफ्त कुछ नही दे रहा हुं, कुछ सुनाओगी तो दुंगा !" माझं वाक्य ऐकताच तिच्या तेजहीन डोळ्यात विलक्षण चकाकी आली. म्लान चेहऱ्यावर एक आगळीच चमक येऊन गेली. "क्या कहा तुमने ? एक बार फिरसे दोहराओ " अत्यंत आतुरतेने तिने विचारले. "यही की तुम कुछ गाओगी, कुछ चीज सुनाओगी तो मैं कुछ देनेवाला...वरना मैं चला !" हे ऐकण्यासाठी बहुधा तिचे प्राण कानी आले असावेत. झटकन पुढे होत तिने माझ्या हातांचे चुंबन घेतले. त्याने माझ्या अंगअंगात वीजेच्या लहरी पसरल्या. मी आता तिथेच बसकण मारली. तिने एक क्षण मातीला हात लावला आणि एक मोठा श्वास घेऊन सुरेल तान घेत गायला सुरुवात केली. तिला फक्त पोटभर जेवण दिल्यानंतर तिनं "हमरी अटरिया पे आवो संवरिया.... " गाऊन दाखवलं होतं.  गाताना ती हसमुख दिसत होती आणि तो अलौकिक स्वर ऐकून माझे डोळे वाहायचे थांबत नव्हते. येणारे जाणारे बाजारबुणगे लोक हैराण होऊन आमच्याकडे पाहत होते. एकदोघांनी तर मलाही भिकारी समजून पैसे दिले होते. गाणं कधी संपलं काही कळलंच नाही. चेहऱ्यावर खजील भाव आणत लोकांनी टाकलेले पैसे तिने गोळा केले. तिला खायला दिलेला सब्जीरोटीचा पुडा आणि जमा झालेले ते पैसे ती पदरात बांधून घेऊ लागली. ती आता उठण्याच्या बेतात आहे हे माझ्या लक्षात आले. तिची काही वास्तपुस्त लावता यावी यासाठी तिचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी मी पुढचा फासा टाकला. एनजीओद्वारे एखाद्या अनाथाश्रमात भरती करून देतो म्हणाल्यावर तळहाताचा मुका घेत म्हणाली, "मुझे यहीं मरना है, खुले अस्मान तले मेरी जान जायेगी तो शायद दुनिया जान जायेगी की बुढी कोठेवालीका हाल क्या होता है ! वरना लोग समझेंगे के कोठेवाले भी अय्याशी में चैन की मौत मरते है !'...तिच्या त्या उत्तराने अंगावर वीज कोसळावी तसं झालं. तिला नाव विचारलं. कसनुसं हसत ती बोलली, "नाम जानकर क्या करोगे ? वैसे गिरीजा नाम हैं मेरा !" बघता बघता फाटक्या साडीच्या पदराने डोळे पुसत ती उठून गेली. मी दिग्मूढ होऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे थिजल्यागत पाहत होतो. तिच्या गोऱ्यापान पावलांना पडलेल्या लालकाळ्या भेगा काळजाला भेदून गेल्या आणि मग मी भानावर आलो. तिच्या बद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा होती. आसपासच्या नव्या पिढीतल्या कुणाकडे माहिती असणं शक्य नव्हतं. तिथं गाणं बजावणं करायला येणाऱ्या उस्ताद लोकांपैकी दोन नाव लगेच डोळ्यापुढे तरळून गेली. त्यातलेच एक होते सत्तरी पार केलेले जुम्मनमियां, ज्यांनी हिराबाईलाही गाण्याची तालीम दिली होती. त्यांच्या पुढ्यात जाऊन बसलो आणि गिरिजाबाईबद्दल काहीतरी सांगा म्हटल्यावर आधी त्यांनी नकार दिला. फार हट्ट केल्यावर तिची सगळी हकीकत सांगितली. वय वाढून उपासमार सुरु झाल्यावर म्हाताऱ्या झालेल्या सरोजचा असाच एका भयाण रात्री उपेक्षित मृत्यू झाला. पण मरताना तिने एक सत्य गिरिजाला सांगितलं. सरोजची एक अनौरस मुलगी होती जी इथंच जन्मली होती आणि इथल्याच गाळात रुतली होती. आपल्या आईची तिला फार घृणा वाटत असे. धंदा करता करता तिच्या पोटातही कुणा एकाने विश्वासाने बीज रोवले. ती गाफील राहिली. तिचं गर्भारपण होईपर्यंत त्यानं साथ दिली पण दैवाने तिच्यावर आघात केला होता. तिला मुलगी झाली पण ती जन्मतः विकलांग होती. मीरा तिचं नाव. तिला चालता येत नव्हते. पाठीवर कुबडही होतं. तिच्या पोटी जन्माला आलेली तशी मुलगी पाहून त्या पोरीचा बाप म्हणवून घेणारा पुन्हा कधी तिकडे फिरकलाच नाही. ती बिचारी त्याची प्रतिक्षा करत या हाडामांसाच्या गोळ्याला प्राणाहून अधिक जपत कशीबशी जगू लागली. आपल्या आईमुळे आपण या गटारात रुतलो याचे तिला फार वैषम्य वाटे त्यामुळे तिने आईशी सगळे संबंध तोडून टाकले. चारेक वर्षे अशीच गेली आणि एका गिऱ्हाईकासोबत ती बाहेर गेलेली असताना अपघातात मृत्यूमुखी पडली. ती गेली आणि मीरा उघड्यावर पडली. जयवंतीने मीराचा जमेल तसा सांभाळ केला. इथल्या बायांना जग लुटत असले तरी त्या एकमेकीसाठी प्रसंगी जीवही देतात. जयवंतीने आपलं आयुष्य पणाला लावून मीराचा सांभाळ केला. इकडे सरोजच्या जीवाची अक्षरशः घालमेल होऊ लागली. त्यातच तिचा करुण मृत्यू झाला. पण मरण्याआधी तिने गिरिजाकडून आपल्या अपंग मीराच्या पालन पोषणाचा शब्द घेतला.  त्या दिवसापासून मीराच्या जगण्याची ती उमेद होऊन गेली. ज्या मावशीमुळे आपलं कुटुंब सुखाचे चार घास खाऊ शकलं तिला दिलेला शब्द निभावणं हे गिरिजाला पुण्याचे काम वाटत होते. आपल्या घासातला घास ती मीराला देई. तिच्यासाठी जगणं हेच तिचं ध्येय झालं होतं. आधी घरादारासाठी झिजलेली गिरिजा आता मीरासाठी झिजत होती. दिवस अगदी वाईट आल्यावर भिक मागून दोघींचं पोट भरत होती. त्या दिवशी मी दिलेला अन्नाचा घास आणि जमा झालेले पैसे घेऊन ती मीराकडेच गेली असावी. जुम्मनमियांशी बोलून झाल्यावर मी तडक पुन्हा मीराला ज्या इमारतीच्या जिन्याखाली ठेवलं होतं तिथे आलो. त्या प्रसंगाचं वर्णन करता येणार नाही इतका काळीज हेलावून टाकणारा तो प्रसंग होता. त्या अंधारकोठडीत, जाळ्या जळमटात ते थकलेले जीव एकमेकाला बिलगून झोपले होते. जर्जर झालेल्या गिरिजाच्या कुशीत मीरा होती. जणू काही तिच्या पोटी जन्माला आली असावी अशी वाटत होती. गिरिजाच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकी रेष झळकत होती. त्यांना जागं करणं योग्य वाटलं नाही. तिथून निघून आल्यावर काही दिवसांनी त्या विस्मरणात गेल्या. काही दिवसांनी तिथं पुन्हा गेल्यावर मात्र जिन्याखालचा तो परिसर भकास दिसला. तिथे कोणीच नव्हतं. फाटक्या तुटक्या चिंध्या आणि एक जर्मनचे चेमटून गेलेले वाडगे तिथे होते. ते गिरीजाच्या हातात त्या दिवशी पाहिलेले भांडे होते. काळजात चर्र झाले. तिथंच इकडं तिकडं वाकून पाहिलं पण सगळीकडे नुसती अस्वच्छता आणि धूळ भरून राहिली होती. त्या दोघींचे काय झाले हे कुणाला विचारायची हिंम्मत माझ्यात नव्हती. जड पावलाने परत फिरलो आणि गल्लीच्या त्या कोपरयापाशी आल्यावर का कुणास ठाऊक 'हमरी अटरिया पे आवो संवरिया...'चे स्वर कानी आल्याचा भास झाला. गिरिजा आणि मीराचे चेहरे गर्दीतल्या माणसात विरघळत जाताना दिसले आणि डोळ्यांतून अश्रू कधी ओघळले कळले देखील नाही.... ( या व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियांची शारीरिक, मानसिक, सामाजिक परिस्थिती सर्वसामान्य माणसांना उमजावी व हा उपेक्षित घटक नेमका का व कसे जगतो याची किमान त्रोटक माहिती लोकांना व्हावी हा या लेखमालेमागील हेतू आहे. समाजातील एक घटक एकीकडे यांचे शोषण करतो तर दुसरा मोठा घटक यांची उपेक्षा करत यांचा तिरस्कार करतो, घृणा करतो याला अल्पसा तरी आळा बसावा हे लेखनप्रयोजन आहे.) समीर गायकवाड यांचे याआधीचे ब्लॉग : रेड लाईट डायरीज : सेक्सवर्कर्सचे रॅकेट - 2

‘रॅकेट’ रेडलाईट एरियाचे…  

नवरात्रीची साडी… रेड लाईट डायरीज – शांतव्वा…. रेड लाईट डायरीज – ‘धाड’! गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध) गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध) उतराई ऋणाची… स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव… गीता दत्त – शापित स्वरागिनी
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
ABP Premium

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Embed widget