एक्स्प्लोर
BLOG : आम आदमी पक्षाच्या शेवटाची सुरुवात?

Delhi Election Result 2025
Source : PTI
Blog : 6 फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल आले होते. 12 एक्झिट पोलपैकी 10 एक्झिट पोलमध्ये भाजप सत्तेवर येईल असे म्हटले जात होते. गेल्या काही काळापासून एक्झिट पोल खोटे ठरत असल्याने हे एक्झिट पोलही खोटो ठरतील असे म्हटले जात होते. परंतु आज लागलेल्या निकालानंतर हे एक्झिट पोल खरे ठरल्याचे दिसत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची जागा धोक्यात असल्याचे भाकितही खरे ठरले आहे.
2011 मध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीत लोकपालासाठी आंदोलन सुरु केले होते. अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास, किरण बेदी, मनीष सिसोदिया यांच्यासह अनेकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे हे आंदोलन चांगलेच गाजले आणि 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करून निवडणुकीच्या मैदानात उडी मारली.
सन 2008 मध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेससोबत आम आदमी पार्टीने भाजपलाही लढत दिली आणि 2013 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला 28 जागा मिळाल्या. तीन वेळा मुख्यमंत्री असलेल्या काँग्रेसच्या शीला दीक्षित यांचा अरविंद केजरीवाल यांनी पराभव केला. मात्र त्याच काँग्रेसच्या मदतीने अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले. पण काँग्रेससोबत सत्ता राबवणे त्यांना जमले नाही आणि 49 दिवसातच त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.
त्यानंतर 2015 मध्ये पुन्हा दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका झाल्या आणि त्यात आपने पुन्हा बाजी मारली. 70 पैकी 67 जागा जिंकून अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदाच्या या कार्यकाळात त्यांनी विविध योजनांच्या घोषणा केल्या आणि चांगली प्रसिद्धी मिळवली. याचा त्यांना 2020 च्या निवडणुकीत फायदा झाला.
सन 2020 च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांवर पुन्हा प्रचंड विश्वास दाखवला आणि त्यांनी 70 पैकी 62 जागांवर विजय मिळवून दिला आणि तेथूनच अरविंद केजरीवाल यांच्या एककल्ली कारभाराला आणि देशपातळीवर नेता म्हणून उदयास येण्याच्या स्वप्नांना सुरुवात झाली. भाजपला तेव्हा फक्त 8 जागा मिळाल्या तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. मात्र 2020 ते 2024 या काळात अरविंद केजरीवाल यांचा पडता काळ सुरु झाला.
आप सरकारचे घोटाळे बाहेर येऊ लागले. सरकारमधील मंत्री तुरुंगात जाऊ लागले. एवढेच नव्हे तर तथाकथित मद्यघोटाळ्यात स्वतः अरविंद केजरीवाल यांनाही तुरुंगात जावे लागेल. त्यामुळे दिल्लीकरांच्या मनातून ते उतरू लागले.
भाजपने ही बाब हेरली आणि दिल्लीच्या प्रत्येक मतदारसंघात स्वतःची ताकद वाढवण्यास सुरुवात केली. हिंदू, श्रीराम मंदिर, एक हैं तो सेफ है हे भाजप कार्यकर्ते आणि संघाच्या स्वयंसेवकांनी दिल्लीच्या घराघरात पोहचवले. यावेळी अरविंद केजरीवाल मात्र स्वतःच्याच स्वप्नात मश्गुल होते. आपल्याला कोण हरवणार असे त्यांना वाटत होते. त्यामुळेच इंडिया आघाडीत असतानाही केजरीवाल यांनी दिल्लीत काँग्रेसला जास्त जागा देण्यास नकार दिला. काँग्रेसनेही केजरीवालांच्या हुकुमशाहीपुढे न झुकता जवळ जवळ सर्वच जागांवर उमेदवार दिले आणि तिथेच भाजपच्या विजयाची मुहुर्तमेढ रोवली गेली.
निवडणुकीआधी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या नागरिकांवर आश्वासनांची बरसात केली, पण केजरीवाल ही आश्वासने पूर्ण करणार नाही याची खात्री दिल्लीकरांना पटली होती. त्यामुळेच निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या बहुतेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री आतिशी आपली जागा कायम ठेवण्यात यशस्वी ठरल्या असल्या तरी त्याचा पक्षाला तसा फायदा होणार नाही.
या निवडणुकीत भाजपने 2020 पेक्षा सहा पट जास्ता जागा मिळवल्या. तर दुसरीकडे काँग्रेसच्या 70 पैकी 68 उमेदवारांना डिपॉजिट गमवावे लागले आहे. अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांच्या मुलाने, परवेश वर्माने 4089 मतांनी पराभव केला.
या पराभवामुळे आम आदमी पक्षाला आता गळती लागण्यास वेळ लागणार नाही. जे सत्तेसाठी आपसोबत आले होते ते आता पुन्हा परत स्वगृही जातील आणि केजरीवालांच्या सोबत मूठभर लोकंच राहतील.
एका अति महत्वाकांक्षेचा आणि जनतेला गृहित धरण्याचा काय परिणाम होतो हे अरविंद केजरीवाल यांना आता समजून आले असेल. दिल्लीतील आपचा हा पराभव म्हणजे केजरीवाल यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाची सुरुवात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
व्यापार-उद्योग
पुणे
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
