गेल्या महिन्याभरात ऑक्सिजनची कमतरता, त्याची टंचाई, सिलेंडरचा काळाबाजार या बातम्यांनी नुसता धुमाकूळ घातला होता. भरमसाठ रुग्णसंख्या असलेल्या रुग्णालयांकडून मागणीच एवढ्या मोठया प्रमाणात होत होती की, व्यवस्थेपुढे आव्हान निर्माण झाले होते. कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम माणसाच्या श्वसन संस्थेवर हल्लाबोल करतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता मंदावते, आणि श्वास घ्यायला त्रास होतो. कोरोनाच्या या संसर्गजन्य आजारात श्वसनविकाराच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असते तर काही रुग्णांना बाहेरून कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत असते. पुणे, नाशिक आणि मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर रुग्णांसाठी केला जात होता. 25 दिवसापूर्वी एका दिवसात संपूर्ण राज्यात 771.347 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर रुग्णांकरीता होत होता. अन्न आणि औषध प्रशासन विभाग दररोज कोरोना रुग्णालयात ऑक्सिजनचा राज्यात होणार वापर आणि सध्याचा उपलब्ध साठा यावर दैनंदिन अहवाल सादर करत असतो. त्यानुसार सध्याच्या घडीला मंगळवारी राज्यात 654.36  मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर करण्यात आला आहे, यामधील तफावत 100 मेट्रिक टन पेक्षा अधिक आहे. यावरून रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी कमी झाली असून हे खऱ्या अर्थाने शुभसंकेत आहेत.


ज्यावेळी अनेक रुग्णांलयामध्ये अचानकपणे प्राणवायू कमी पडत असल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासनाने पहिले महत्त्वपूर्ण पाऊल उचलले ते म्हणजे, साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80 % व उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील. यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60 % आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50 % या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला जायचा. हे केल्यानंतर लक्षात आले ऑक्सिजनची ज्या वाहनाने वाहतूक करतात त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणींना सामना करावा लागतो, परिणामी ऑक्सिजन वेळेवर रुग्णालयांना पोहचत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासनातर्फे रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला.त्यामुळे या वाहनाची वाहतूक कोंडी मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही म्हणून या वाहनांवर सायरन आणि रुग्णवाहिकेला वापरत येणारी बत्ती लावण्यास अनुमतीही दिली आहे.


एस पी ओ 2, या चाचणीद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. या आणि अन्य मापदंडानुसार डॉक्टर रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यायचे कि नाही ते डॉक्टर ठरवतात. कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील प्राणवायू घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम प्राणवायूची गरज भासते. जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15 % रुग्णांना कोरोनाच्या उपचारात प्राणवायूची गरज भासत आहे.


मंगळवारच्या आकडकेवारीनुसार संपूर्ण राज्यात 654.36 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर रुग्णांकरीता करण्यात आला आहे त्यामध्ये सर्वात अधिक वापर आजही पुणे विभाग करीत असून तो 258.66 मेट्रिक टन इतका आहे. तर 25 दिवसापूर्वी तो 347.3 मेट्रिक टन इतका आहे. या विभागात इतका वापर का होतोय त्याची कारणे फार सोपी आहेत. पुणे विभागात मुख्यत्वे करून पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या मोठ्या जिल्ह्याचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. या पूर्ण विभागात 436 कोरोनाचा उपचार करणारी स्वतंत्र रुग्णालये असून राज्यात सर्वात जास्त रुग्णालय असणार हा विभाग आहे. या विभागातील एकट्या पुणे जिल्ह्याला सध्याच्या घडीला 165.860  मेट्रिक टन इतका वापर होत आहे. तर तोच 25 दिवसापूर्वी  मेट्रिक टन प्राणवायूचा वापर एका दिवसात केला गेला होता.


मुंबई शहराची मागणी मात्र 25 दिवसाच्या तुलनेत थोड्या प्रमाणात का होईना 20 मेट्रिक टनाने वाढली आहे ती पूर्वी 86.204  मेट्रिक टन इतकी होती आता मात्र 107.48 मेट्रिक टन इतकी झाली आहे. मुंबई विभागात फक्त मुंबई जिल्ह्याचा समावेश असून या विभागात कोरोनावर उपचार करणारी 61 रुग्णालये आहेत. नाशिक विभागातही ऑक्सिजनचा वापर कमी झाला आहे. 25 दिवसापूर्वी तो 92.060 मेट्रिक टन इतका होता आणि सध्याच्या घडीला 73.730 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन दिवसाला वापरला गेला आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात एकूण 274 कोरोनाचे उपचार देणारे रुग्णालय आहेत.


21 सप्टेंबरला 'प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक ! ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात होते . त्यामध्ये कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या महत्तवपूर्ण औषधाची टंचाई, बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीची जागा काही दिवसांपासून या आजाराच्या उपचारात योगदान ठरणाऱ्या प्राणवायूने घेतली आहे. कुठल्याही वैद्यकीय तज्ज्ञाने स्वप्नातही विचार केला नसेल की राज्यात रुग्णाच्या उपचारात वापरात येणाऱ्या प्राणवायूची टंचाई भासून त्यावर संपूर्ण राज्यात यावरून ओरड होऊ शकते. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांपासून ते अन्न औषध प्रशासन मंत्री सध्या या प्राणवायूचा पुरवठा सर्व रुग्णालयातील राज्यात व्यवस्थित व्हावा म्हणून युद्धपातळीवर काम करीत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने 'प्राणवायूचा' वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आणि त्यातूनच सुरु झाल्या त्या प्राणवायू उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी, गेल्या काही दिवसाचा जर अन्न औषध प्रशासन विभागाचा कोरोनाच्या अनुषंगाने वापरण्यात येणाऱ्या दैनंदिन प्राणवायूचा अहवाल पहिला तर सर्वात जास्त पुणे विभागात प्राणवायूचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्या खालोखाल नाशिकात प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. दीड महिन्यापूर्वी कोरोनाचा 'हॉटस्पॉट' असणाऱ्या मुंबई विभागाला ऑक्सिजन वापराच्या बाबतीत मात्र पुणे आणि नाशिक विभागाने मागे टाकले आहे. या दोन विभागाचा प्राणवायूचा वापर संपूर्ण राज्यात एकूण वापरण्यात येणाऱ्या प्राणवायू वापरच्या 50 टक्क्यापेक्षा अधिक आहे.


संपूर्ण राज्यातील ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे ही गोष्ट चांगली आहे.या लेखात मागील 25 दिवसाची ऑक्सिजन मागणीची तुलना केली गेली असता मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजन कमी लागत आहे. त्याच तुलनेने एकंदरच रुग्णसंख्याही कमी झाल्याचा हा परिणाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रुग्णांनी कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास तात्काळ तज्ञांचा सल्ला घेतल्यास ऑक्सिजन मागणीचे प्रमाण घटण्यास मदत होऊ शकते.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग