BLOG: राजकारणातही ‘गुलाबी’ रंग असतो हे दाखवणारे दादा..!

माझी पिढी ज्यांचं राजकारण पहात मोठी झाली, त्यातलं एक महत्वाचं आणि मोठं नाव अजित पवार...आजकाल जवळपास सगळेच नेते पत्रकार परिषदा घेतात...पण ज्यांच्या पत्रकार परिषदांमधून खरंच काहीतरी बातमी मिळायची, आणि एखाद्या मिश्कील कोपरखळीने दिवसभराचा ताण हलका व्हायचा असे केवळ अजितदादा होते. खरंतर पत्रकारिता करत असताना, बातम्या देताना कोणालाही दादा, ताई, भाऊ, राव असं बोलायचं नाही हा धडा खूप आधी गिरवला होता. त्यामुळे समोर अजितदादा असं लिहून आलं तरी ते आपसूक अजित पवार (Ajit pawar) असंच वाचलं जायचं. पण काल त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समोर आली, आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले (Politics) 'दादा' गेले हीच पहिली भावना मनात आली आणि तीच ओळ ओठांवरही आली...
वास्तविक अजितदादांना प्रत्यक्षात पाहिलं ते एबीपी माझाच्या विविध कार्यक्रमांमध्ये. माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात जेव्हा जेव्हा अजित पवारांच्या सेशनचं ओपन करण्याची संधी मिळाली, त्या प्रत्येकवेळी मनात थोडीशी भिती असायची की एखादा शब्द दादांनी पकडला तर काही खरं नाही...व्हिजनच्या मंचावरुन राजकारणापलिकडे जेव्हा अजितदादा त्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन मांडायचे तेव्हा त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र उपस्थित आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभा रहायचा. अनेकदा बातम्या देताना 'अजित पवारांची मिश्किल टिप्पणी' ही ओळ आम्हा सगळ्यांसाठी परिचयाची झाली होती. अजित पवार वेळेआधी कार्यालयात पोहोचलेत हे कळल्यावर कार्यालयात जशी अधिकाऱ्यांची धावपळ व्हायची तशीच जाहिराती तोडून परत बुलेटिनवर जाताना आमची स्टुडिओत धावपळ व्हायची… ती तशी परत आता कधीच होणार नाही.
शरद पवारांच्या राजकीश मुशीत अजित पवार घडले हे सगळ्यांना माहिती, पण त्यांच्या नावामागे नाव असलेल्या अनंतरावांचा झंझावाती राजकारण करण्याचा डीएनए त्यांनी पुरेपूर जपला. अनंतराव थेट राजकारणात नसले तरी शरद पवारांच्या राजकीय प्रवासातलं पहिलं पाऊल यशस्वी केलं ते अनंतराव पवारांनीच. अजित पवारांना मुख्य प्रवाहातल्या राजकारणात मिळालेलं पहिलं यश म्हणजे 1991 साली, बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदारकी... पण तत्कालीन राजकीय गरज ओळखून शरद पवारांसाठी त्यांनी त्या पहिल्या वहिल्या यशावर हसत हसत पाणी सोडलं. त्यानंतर, राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणात शरद पवारांची विनाकारण बदनामी होतेय असं सांगत निवडणुकांआधी आमदारकीचा राजीनामाही दिला. पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग फसल्यानंतर रात्री हातात चॉकलेट्स घेऊन धावत धावत सिल्व्हर ओकच्या पायऱ्या चढणाऱ्या अजित पवारांची ती पाठमोरी आकृती आजही डोळ्यांसमोर आहे. राजकारणासारख्या रुक्ष क्षेत्रात असूनही अजितदादांनी त्यांची भावनिकता जपली होती, ओलावा जपला होता…
हाच दिलदारपणा अजितदादांनी शेवटपर्यंत जपला. दटावणी केली पण मायेने विचारपूसही केली, मस्करी केली, खिल्ली उडवली पण चांगल्या कामांसाठी शाबासकीची थापही दिली, डोळ्यात जरब होती पण ओठांवर दिलखुलासही हास्यही होतं... बोलण्यात बेफिकरी होती, पण त्याचवेळी प्रत्येक वाक्यात महाराष्ट्राच्या, जनतेच्या भल्याची कळकळही होती. म्हणूनच अजित पवार सगळ्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे लाडके होते. म्हणूनच वेगळी राजकीय वाट निवडताना तीन चतुर्थांश राष्ट्रवादी अजित दादांच्या खिशात होती. त्यानंतर दोहोबाजूंनी होणारी चौफेर टिका-टीप्पणीही आम्ही पाहिली आणि कालपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये असलेली अगतिकता आणि हमसून हमसून रडणारे चेहरेही पाहिले.
केलेल्या चुका स्वीकारणं आणि घेतलेला प्रत्येक निर्णय ताकदीने निभावणं ही धडाडी, ही हिंमत अजित दादांकडेच होती. शेवटच्या श्वासापर्यंत ते लोकाभिमूख राजकारण करत होते याची साक्ष अपघातानंतर काल माळरानावर अर्धवट जळलेल्या अवस्थेत पडलेले कागद देत होते. जात, धर्म, विचारसरणी या पलिकडे लोकांचं काम करुन देण्यासाठी सत्ता लागते आणि त्यासाठी प्रसंगी तडजोड करत लवचिकता दाखवावी लागते याचा आदर्श अजित पवारांनी घालून दिला.
बाकी काल शरद पवारांची अवस्था बघून मी फार खंतावले... पक्ष फुटल्यानंतर आशावादी चेहरा कोण वाटतो या प्रश्नाचं उत्तर देताता हसतमुखाने 'शरद पवार' असं म्हणत त्यांनी दाखवलेला दुर्दम्य आशावाद चकीत करणारा होता आणि काल 'हा केवळ अपघात आहे, यात राजकारण आणू नका' सांगताना खाली मान घालून एक एक शब्द कष्टाने उच्चारणारे शरद पवार पाहून खोल आत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. हा आघात थोरले पवार कसे पचवणार याचं उत्तर आता कदाचित् त्यांच्यापाशीही नसावं. आणि त्यांच्यासोबत दिसले शून्यात नजर असेलेले, खांदे पाडून बसलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आजवर कॅमेऱ्यासमोर बोलताना कधीही फडणवीस चाचरले नाहीत, पण काल चाचपडत शब्द शोधून बोलणारे देवेंद्र फडणवीस पाहिले आणि जाणवलं की देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिकरित्या काय गमावलंय… राजकीय गणितांचं नंतर बघता येईल.
काल संजय राऊतांचं एक वाक्य मनावर कायमचं कोरलं गेलं. 'अजित दादांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण बेचव आणि अळणी होईल.' कालपासून हे सगळं लिहिण्याचा अनेकदा प्रयत्न केला, जमलं नाही, झेपलं नाही...शेवची एकच म्हणावंसं वाटतं, महाराष्ट्राच्या राजकारणातला जिंदादिलपणा आज कायमचा संपला, मैत्र संपलं, खोचक कोपरखळ्या संपल्या, प्रेमळ धाक, दरारा संपला, मिश्किलपणा संपला... आता मागे उरलंय ते सत्ताकारणाचं कोरडं, शुष्क रहाटगाडगं...जे उद्यापासून अजितदादांशिवाय हाकलं जाणारंय...
प्रज्ञा पोवळे
महाराष्ट्राच्या दैदिप्यमान राजकीय परंपरेत अजित पवारांचं नाव अमर राहील, जेव्हा जेव्हा गुलाबी रंग दिसेल, तुमची आठवण नक्की येईल
दादा श्रद्धांजली...
ट्रेंडिंग न्यूज
























