Raju Shetti : जिल्हानिहाय पिकांची प्रतवारी करा, प्रकिया उद्योगांसाठी आर्थिक तरतूद वाढवा, राजू शेट्टींची मंत्री पशुपती कुमार यांच्याकडं मागणी
आज राजू शेट्टी यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस पासवान (Pashupati Kumar Paras) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशातील अन्न प्रक्रिया उद्योगातील सुविधांबाबत चर्चा केली

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) हे सध्या दिल्लीत आहेत. ते विविध केंद्रीय मंत्र्यांच्या गाठी भेटी घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भातील मागणी आणि निवदने देत आहे. आजही शेट्टी यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस पासवान (Pashupati Kumar Paras) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशातील अन्न प्रक्रिया उद्योगातील पायाभूत सुविधांबाबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी राजू शेट्टी यांनी शिवार ते ग्राहक शेतमालाची विक्री करण्यासाठी धान्यासह भाजीपाला साठवणुकीचे क्षमता वाढवावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार यांच्याकडे केली आहे.
काल राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली होती. त्यानंतर आज राजू शेट्टी यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस पासवान यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत.
राजू शेट्टींनी नेमक्या कोणत्या मागण्या केल्या आहेत
1) देशामध्ये प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत सुरु असलेल्या 28 क्लस्टरना जी. एस. टी मधील सवलत देण्यात यावी अशी प्रमुख मागणी राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस पासवान यांच्याकडे केली आहे.
2) शिवार ते ग्राहक शेतीमाल विक्रीसाठी देशामध्ये धान्य व भाजीपाला साठवणुकीचे क्षमता वाढवावी.
3) जिल्हानिहाय पिकांची प्रतवारी करुन प्रकिया उद्योगांना चालना देण्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद तूटपूंजी असून ती वाढवण्यात यावी.
4) महाराष्ट्रात विशेषकरुन आंबा, कांदा, कडधान्य आणि तेलबियांवर मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया, द्राक्ष, संत्रा, डाळिंब, काजू, स्टॉबेरी, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादन, मासेमारी, कुक्कटपालन यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन ही महाराष्ट्राची ओळख आहे. वाढलेल्या महागाईमुळं या प्रकल्पांच्या किंमतीत वाढ झाल्याने अनुदानाची रक्कम वाढवून बजेटमधून तरतूद वाढवण्यात यावी.
या प्रमुख चार मागण्या राजू शेट्टी यांनी मंत्री पशुपती कुमार पारस पासवान यांच्याकडे केल्या आहेत. आता त्यांच्या मागण्यांना केंद्र सरकार कसा प्रतिसाद देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, कालच राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली होती. चीनी बनावटीच्या प्लॅस्टीक कृत्रिम फुलामुळं (Plastic artificial flowers) देशातील फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. देशातील बाजारपेठेत चीनी बनावटीच्या प्लॅस्टीक फुलांची आयात वाढली आहे. या आयातीमुळं पुन्हा एकदा देशातील फुलशेतीचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं चीनी कृत्रिम प्लॅस्टीक फुलांच्या वापरावर आणि आयातीवर तातडीनं बंदी घालावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली होती. याबाबत काल त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं. एकीकडे चीनचे आक्रमण वाढले म्हणता आणि दुसरीकडे चीनी प्लॅस्टिक कृत्रिम फुलांची आयात का करता असा सवालही शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर आज पुन्हा शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस पासवान यांची भेट घेत विविध मागण्या केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Raju Shetti : चीनचे आक्रमण वाढले म्हणता आणि दुसरीकडे चीनी प्लॅस्टिक कृत्रिम फुलांची आयात करता : राजू शेट्टी
- Onion News : बांगलादेश कांदा घेणार नसेल तर त्यांच्या कपड्यांच्या आयातीत अडथळा निर्माण करा : राजू शेट्टी
Before You Go
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल






















