RCB Victory Parade Stampede : क्रिकेटला गालबोट,सेलिब्रेशनला डाग; बंगळुरुतील चेंगराचेंगरीचं कारण काय?
बंगळुरू : आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाच्या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. विजेत्या संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर या चेंगराचेंगरीत दहा पेक्षा जास्त चाहते जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या RCB ने फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करुन आयपीएल 2025 च्या चषकावर नाव कोरलं. तब्बल 18 वर्षांनी RCB ने मिळवलेल्या विजयामुळे कर्नाटकसह विराटच्या चाहत्यांचा उत्साह प्रचंड आहे. त्यामुळेच आज बंगळुरुत अनेक चाहते चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी जमा झाले आहेत.
आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, 10 हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आरसीबीनं आयपीएलच्या 18 व्या हंगामाचं विजेतेपद पंजाब किंग्जला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 6 धावांनी पराभूत करत जिंकलं यानंतर बंगळुरुत काल रात्रीपासून विजयाचा जल्लोष करण्यात येत आहे. आज सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी जल्लोष साजरा करण्यात येणार होता. मात्र, आरसीबीच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या देखील वाढू शकते. याशिवाय 10 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती.
























