India Pakistan War | पाकिस्तानचा रहीम यार एअरबेस भारताने करून टाकला बरबाद
India Pakistan War | पाकिस्तानचा रहीम यार एअरबेस भारताने करून टाकला बरबाद
India Pakistan War situation: भारताच्या लष्करी तळांवर शुक्रवारी रात्री सुपरसॉनिक क्षेपणास्त्रं डागणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांनी एअर स्ट्राईक (Air Strike) करुन पाकिस्तानी लष्कराचे चार हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत. यापैकी रहिम यार या हवाई तळावर भारताच्या फायटर विमानांकडून क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा करण्यात आला. यामध्ये रहीम यार हवाई तळाचे मोठे नुकसान झाले आहे. येथील विमानांसाठीची धावपट्टी क्षेपणास्त्रांमुळे पूर्णपणे बेचिराख झाली आहे. त्यामुळे आता या हवाई तळावरुन पाकिस्तानी लढाऊ विमानांना उड्डाण करता येणार नाही.
भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने शनिवारी सकाळी पाकिस्तानमध्ये घुसली होती. या विमानांनी क्षेपणास्त्रांनी तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत. रावळपिंडीलगतच्या नूर खान हवाई तळाला भारताच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य केले आहे. याशिवाय, मुरीद आणि सुकूर या हवाई तळांवरही भारतीय हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवला होता. या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे खूप मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या एअर डिफेन्स यंत्रणेला चकवा देऊन भारताची क्षेपणास्त्रे अचूकपणे जाऊन लक्ष्यावर आदळली. हे भारताच्यादृष्टीने खूप मोठे यश मानले जात आहे. यानिमित्ताने भारतीय हवाई दल पाकिस्तानपेक्षा किती सरस आहे, हे दिसून आले आहे.
याशिवाय, भारतीय सैन्याकडून सियालकोटमधील लुनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला आहे. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या























