Assembly Elections Samant VS Salvi : साळवींनी नकार दिला तर भास्कर जाधव? : ABP Majha
कोकण विभाग ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो.. कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या उदय सामंत यांच्याविरोधात उमेदवारासाठी आतापासून शोध सुरू झाला आहे. रत्नागिरी - संगमेश्वर या उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये राजापूर-लांजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना विचारणा करण्यात आली आहे. पण, साळवी अद्याप तरी रत्नागिरीमधून लढण्यास राजी होत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, पक्षानं सांगितल्यास रत्नागिरीमधून देखील लढेन, अशी प्रतिक्रिया गुहागरचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली होती. शिवाय, त्यांनी एबीपी माझाकडे बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला मुलगा विक्रांत जाधव याला गुहागरमधून उमेदवारी मिळू शकते असे सुतोवाच देखील केले होते. त्यामुळे आता विविध मतदारसंघ, समीकरणं आणि उमेदवार याबाबत सध्या कोकणातील राजकीय वर्तुळात आराखाडे बांधले जात आहेत. मुख्य बाब म्हणजे भाजपने देखील कोकणात लक्ष केंद्रीत केल्यानं राजकीय सारीपटावरच्या चाली महत्वाच्या असणार आहेत.