Uddhav Thackeray Full Speech MVA Morcha : महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार
मुंबई: कर्नाटक असो वा आणखी इतर शक्ती असो, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत, महाराष्ट्राचे लचके तोडत आहेत, त्यामुळे या महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार असा निश्चय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आजचा महामोर्चा हा त्याचाच भाग असून हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे असंही ते म्हणाले.
महामोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. ज्या वेळी या मोर्चाची घोषणा केली त्यावेळी तुम्ही चालणार का असा सवाल मला करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्या छाताडावर चालणार असल्याचं मी म्हणालो. मुंबईसह महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही.
























