Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Farmer Agitation Maharashtra : शेतकऱ्यांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर 20 ऑगस्टपासून कृषीमंत्र्यांच्या घरासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अहिल्यानगर : नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, पीक विम्याचे जुने ट्रिगर पुन्हा लागू करावेत आणि वन, देवस्थान, गायरान, वरकस तसेच घरांच्या तळाच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात तीव्र व व्यापक 'जेल भरो' आंदोलन करण्यात आले. राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आणि प्रशासनाला निवेदने सादर केली.
कर्जमाफी योजनेत केवळ 50 हजार रुपयांचे अनुदान देऊन सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची बोळवण केली असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. "आम्ही नियमित कर्ज भरले म्हणजे काय पाप केले?" अशी संतप्त भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन नियमित कर्जदारांना किमान 2 लाखांचा दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
किसान सभेच्या मुख्य मागण्या
नियमित कर्जदार : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान त्वरित द्यावे.
जमिनींचे हक्क : देवस्थान जमिनींवरून शेतकऱ्यांना बेदखल करणे तातडीने थांबवावे आणि देवस्थान, वन, गायरान, वरकस व घरांच्या तळाच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात.
पीक विमा : पीक विम्याचे आधीचे ट्रिगर निकष पुन्हा लागू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये आंदोलनाची धग पेटली
ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, बीड, परभणी, नांदेड, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा आणि नंदुरबार यांसह राज्यातील एकूण 23 जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलने करून जेल भरोचा नारा दिला.
कृषीमंत्र्यांच्या घरासमोर 'महामुक्काम'चा इशारा
शासनाने या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास आणि मागण्या मान्य न केल्यास, येत्या 20 ऑगस्ट रोजी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर भव्य आणि बेमुदत राज्यव्यापी 'महामुक्काम आंदोलन' सुरू करण्याचा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.
आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व
राज्यभरातील या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, सरचिटणीस डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, आमदार विनोद निकोले, किरण गहला, इरफान शेख, सुभाष चौधरी, उद्धव पौळ, अजय बुरांडे, डॉ. अमोल वाघमारे, सदाशिव साबळे, यशवंत झाडे, अर्जुन आडे, शंकर सिडाम, कुमार मोहरमपुरी आणि माणिक अवघडे आदी वरिष्ठ नेत्यांनी केले.
ही बातमी वाचा:
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या





















